कलिंगडानंतर आता आंबा, अहिल्यानगरमध्ये आंब्याचा रस खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा
मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांना विषबाधा झाल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता अहिल्यानगरातील शेवगावमध्ये आमरस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे.
जायभाय कुटुंबातील सर्वांनी आंब्याचा रस खाल्ला. त्यानंतर जायभाय कुटुंबातील सात जणांना चक्कर येणे, तोल जाणे असा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी सुरुवातीला सर्वांना शेवगावमधील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, परंतु सर्वांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही केमिकल्स पोटात गेल्याने अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो, असे उपचार करणारे डॉ. सचिन पांडुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सात रुग्णापैकी सहा जणांना रुग्णालयातून वेगवेगळ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर अजूनही उपचार सुरू आहे, मात्र सर्वांची प्रकृती स्थिर आहे. कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेल्या आंब्यांचा संशय आल्याने विक्रेत्यांकडील आंब्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेले आंबे पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
Comments are closed.