हिंगोलीत लाखो रुपये खर्चून आणलेल्या तीन नव्या शववाहिका धूळ खात; वर्षभरापासून हस्तांतरण प्रलंबित

हिंगोली : मृतदेहाची वाहतूक सन्मानपूर्वक आणि सुलभ पद्धतीने व्हावी यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करुन तीन शववाहिका उपलब्ध करून दिल्या. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने हिंगोली जिल्ह्याला मिळालेल्या तीन नव्या कोऱ्या आणि वातानुकूलित (AC) शववाहिका (Hingoli Government Hospital Ambulance) गेल्या वर्षभरापासून वापराविना पडून आहेत.

गरिबांना मृतदेहांच्या वाहतुकीसाठी खासगी वाहनांचा अवाजवी खर्च सोसावा लागत असताना, दुसरीकडे शासनाने दिलेल्या अत्याधुनिक वातानुकूलित शववाहिका केवळ हस्तांतरण न झाल्यामुळे हिंगोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात धुळीने माखलेल्या अवस्थेत उभ्या आहेत.

Hingoli Ambulance Issue : वर्ष झाले तरी हस्तांतरण नाहीच!

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल्या या तीन शववाहिका हिंगोली जिल्ह्याला उपलब्ध होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, अद्यापही या शववाहिकांचं कोणत्याही आरोग्य संस्था किंवा इतर संबंधित आस्थापनांकडे अधिकृत हस्तांतरण करण्यात आलेलं नाही.

या तीनही शववाहिका जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात आडगळीच्या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आल्या आहेत. दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभ्या असल्याने त्यांच्यावर आता धुळीचे मोठे थर साचले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, एका वर्षांपूर्वी दाखल झालेल्या या शववाहिकांविषयी जेव्हा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी या गाड्या केवळ 4 ते 5 महिन्यांपूर्वीच आल्याची माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या या उत्तरावरून आरोग्य विभागाचा सावळा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Hingoli Civil Hospital News : पालिकेची मागणी धुडकावली; जनतेची लूट

गरिबांचे हाल थांबवण्यासाठी आणि नागरिकांना मोफत सेवा देण्यासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वीच वसमत नगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागाकडे एका शववाहिनीची रीतसर मागणी करण्यात आली होती. परंतु, आरोग्य विभागाने अद्यापही वसमत पालिकेला ती शववाहिनी हस्तांतरित केलेली नाही.

परिणामी, जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या नातेवाईकांचा मृतदेह वाहून नेण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स किंवा वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खाजगी चालकांकडून यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जात असून, जनतेची आर्थिक लूट होत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी अशा प्रकारे धुळीत मिळत असल्यामुळे हिंगोलीतील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ही बातमी वाचा:

Comments are closed.