भारतीयांनी तात्काळ इराण सोडावे!

भारतीय दूतावासाकडून सूचना जारी : प्रवास न करण्याचाही सल्ला

वृत्तसंस्था

तेहरान, नवी दिल्ली

इराण आणि इस्रायल यांच्यात पुन्हा तीव्र हवाई हल्ले सुरू झाले आहेत. सोमवार, 8 जून 2026 रोजी दोन्ही देशांमध्ये पुन्हा थेट लष्करी कारवाई सुरू झाल्यानंतर भारत सरकारने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तेहरानमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांना शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.

इराणमधील अलीकडील घडामोडी आणि वेगाने बिघडत चाललेली सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता कोणत्याही भारतीय नागरिकाने सध्या इराणला प्रवास करू नये, असे तेहरानमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. सध्या इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना कोणत्याही आवश्यक मार्गाने तात्काळ देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशात युद्धासारखे वातावरण निर्माण झाल्यानंतर इराणमधील भारतीय दूतावासाला एक सूचनावली जारी करण्यास भाग पडले आहे.

Comments are closed.