Raj Thackeray claims that Mumbai local services have collapsed due to external fraud


पुणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या पुढे सीएसएमटीच्या दिशेने जाताना येणाऱ्या वळणावर सोमवारी (ता. 9 जून) मोठा अपघात झाला. मुंब्रा स्थानकाच्या पुढे येणाऱ्या वळणावर दोन्ही लोकल बाजूला आल्याने यावेळी दोन्ही लोकलमधील फूटब्रीजवरून प्रवास करणारे प्रवासी लोकलच्या खाली पडले. दोन्ही लोकलमधील एकूण 13 जण खाली पडले असून यातील पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर राजकीय नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावरून काही प्रश्न उपस्थित करत देशात माणसाची किंमत शून्य झाल्याचे म्हटले आहे. (Raj Thackeray claims that Mumbai local services have collapsed due to external fraud)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघाताबाबत विचारणा करण्यात आली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, आज जो अपघात झाला ते दुर्दैव आहे, पण मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच असे अपघात होत आहेत. असा एकही दिवस जात नाही की, ज्यामध्ये अपघात होत नाही. कोणाचा हात जातो, कोणाचा पाय जातो, असे अपघात घडतच आहेत. मग रेल्वे चालते तरी कशी? हा जगाला पडलेला एक प्रश्नच आहे. मुंबईतल्या लोकांनी केंद्र सरकारकडे अनेकदा मागणी केली की, हे अपघात थांबविण्याकरिता मुंबईत एक महामंडळ करा किंवा मुंबईचे रेल्वे मंडळच वेगळे करा. पण अजूनही या गोष्टींकरता काहीच होत नाहीये, असे म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा… Jitendra Awhad : रेल्वेला सर्वाधिक महसूल मुंबई लोकलमधून, पण सुविधांचे काय? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

तर, या शहरांचे काय झाले हे पाहणे गरजेचे आहे. या सगळ्या शहरांचा विचका झाला आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली उंच इमारती बांधल्या जात आहेत, मात्र रस्ते नाहीत. रस्ते नसल्याने पार्किंग नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. जर कुठे आग लागली तर अग्निशमन दलाचा बंब आत जाऊ शकत नाही, अशी सगळ्या शहरांची व्यवस्था आहे. आपल्याकडे शहर नियोजन नावाची गोष्टच नाही. शहरांवर बाहेरुन येणारे आदळणारे लोंढेच यामुळेच रेल्वे यामुळेच कोलमडली आहे. वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. लोकांना चालण्यासाठी फुटपाथ नाही. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय, जातंय माहिती नाही. मेट्रो, मोनो इतर सोयीसुविधा याने प्रश्न सुटणार नाहीत. मुंबईत मोनो, मेट्रो असताना गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबले का? मोनो, मेट्रो कोण वापरतंय हे पाहण्यास कोणी तयार नाही. निवडणुका, प्रचारात सगळे गुंतले आहेत. शहरं म्हणून याकडे पाहण्यास कोणी तयार नाही. शहरावर बोलल्यास त्याला किंमत नाही, असे यावेळी राज ठाकरेंनी म्हटले.

तसेच, उद्धव-राज एकत्र येण्यावर जेवढी चर्चा झाली. तेवढा वेळ रेल्वे अपघातात जितके मृत्यू झाले आहेत, त्यांच्या बातम्या लागणार आहेत का? कशाला महत्त्व द्यायचे हेच समजेनासे झाले आहे. प्रसारमाध्यमांनी शहरातील समस्यांकडे लक्ष वेधले पाहिजे. इतर सर्व किरकोळ गोष्टी आहेत. केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे. प्लॅटफॉर्मवर गर्दी पाहिली तर लोक कसे आत शिरतात, बाहेर येतात हा प्रश्नच पडतो. कॉलेजमध्ये असताना दोन वर्षं मीदेखील रेल्वेने प्रवास केल्याने मला त्याची कल्पना आहे. संध्याकाळी मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर शिरुन दाखवा. गर्दी नव्याने निर्माण झालेली नाही. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा कशाला द्यावा, याउलट तिथे जाऊन परिस्थिती पाहावी, सुधारणा करावी. लोकलचे दरवाजे बंद केले तर आत गुदमरुन मरतील. एक जागा बाहेर पडण्यासाठी, एक जागा आत जाण्यासाठी हवी. आपल्या देशात माणसाची किंमत नाही. जगात इतर कुठे घडले असते तर कसे दिसले असते. हे मंत्री परदेशात जातात, ते नेमके काय घेऊन येतात. तेथील रेल्वे नाही, पण किमान तेथील विचार तरी आणा. हे सगळे निराशाजनक आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी मुंब्रा घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.



Source link

Comments are closed.