7 षटकार, 7 चौकार! वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्राच्या गोलंदाजांना झोडून काढलं, शतक ठोकत रचला इतिहा


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीचं शतक : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मधील सलग तीन सामन्यांत अपेक्षेपेक्षा कमी कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीवर (Vaibhav Suryavanshi) मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. अनेकांनी त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण या सर्व टीकेला वैभवने आपल्या बॅटनेच योग्य उत्तर दिलं. चौथ्या सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध मैदानात उतरताच वैभवने जबरदस्त शतक झळकावलं. खास म्हणजे त्याने षटकार मारत शतक पूर्ण केले. वैभवने आपल्या शतकात जितके षटकार ठोकले तितकेच चौकारही मारले आणि फक्त 58 चेंडूंत शतक ठोकले.

61 चेंडूंत नाबाद 108 धावा

महाराष्ट्राविरुद्ध बिहारने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 3 गडी गमावून 176 धावांचा टप्पा गाठला. यात उपकर्णधार वैभव सूर्यवंशीने एकहाती नाबाद 108 धावा केल्या. 177 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने खेळलेल्या या इनिंगमध्ये त्याने केवळ 61 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकार मारले. ओपनर म्हणून उतरलेल्या वैभवची बिपिन सौरभसोबत मोठी भागीदारी जमली नाही. त्यानंतर पीयूषसोबतही जास्त वेळ टिकता आलं नाही. मात्र तिसऱ्या विकेटसाठी आकाश राजसोबत त्याने अर्धशतकी भागीदारी रचत संघाला चांगल्या स्थितीत आणले.

पहिलंच SMAT शतक

14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आकाश राज बाद झाला तेव्हा बिहारचा स्कोर 3 बाद 101 असा होता. त्यानंतर वैभवने केवळ धावांचा वेगच वाढवला नाही, तर हात मोकळे करत अर्धशतक गाठलं आणि त्याच धडाक्यात शतकाची उंबरठाही पार केली. पहिल्या तीन सामन्यांत मिळून फक्त 32 धावा करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने चौथ्या सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध तडाखेबाज शतक झळकावलं. विशेष म्हणजे SMAT कारकिर्दीतलं हे त्याचं पहिलंच शतक ठरलं.

वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला

क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवल्यापासून 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी एकामागून एक तुफानी कामगिरी करत आहे. आता, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध शतक झळकावून, वैभवने इतिहास रचला आहे. सूर्यवंशी वयाच्या 14 व्या वर्षी आणि फक्त 17 टी-20 सामन्यांमध्ये, तीन टी-20 शतके झळकावणारा जगातील पहिला तरुण खेळाडू बनला आहे. खरंच, क्रिकेट इतिहासात कोणत्याही खेळाडूने इतक्या लहान वयात ही कामगिरी केलेली नाही. तीन सामन्यांतील अपयशानंतर असा दमदार पुनरागमन करत वैभव सूर्यवंशीने संघाचं मनोबल उंचावलं असून आगामी सामन्यांसाठीही तो तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा –

टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये रेड्डीला संधी का नाही?, संघ निवडीत काहीतरी गडबड…; दुसऱ्या वनडे सामन्याआधी दिग्गज क्रिकेटपटू संतापला

आणखी वाचा

Comments are closed.