Vishal Patil criticized for saying BJP has created division in our house
सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधत भाजपाने आमच्याही घरात फूट पाडल्याचे म्हटले आहे.
सोलापूर : गेल्या काही दिवसांत भाजपाने अनेक महत्त्वाच्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला असून यामध्ये काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. जयश्री पाटील या पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्या लवकरच काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानुसार, जयश्री पाटलांनी हक्काच्या पक्षातून बाजूला होत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशावर खासदार विशाल पाटील पहिल्यांदाच थेटपणे व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आमच्या घरात सुद्धा भारतीय जनता पक्षाने फुट पाडली आहे, असे म्हणत खासदार पाटलांनी आपले मत व्यक्त केले आहे. यासोबत त्यांनी भाजपावर आगपाखड केली आहे. (Vishal Patil criticized for saying BJP has created division in our house)
सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटले की, आमच्या घरात सुद्धा भारतीय जनता पक्षाने फूट पाडली आहे. आमच्या घरात फूट पाडण्यासाठी आमच्या एका वहिनींचा भाजपाने प्रवेश करून घेतला. आमचे पालकमंत्री रोज भाषण करतात की, विशाल पाटलांना आम्ही घेणार आहे. अहो… मी अपक्ष निवडून आलो. भाजपाच्या दोन टर्म निवडून आलेल्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो. मी लोकांना सांगितले की, मी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचाराचा आहे, म्हणून मी निवडून आलो, असे म्हणत खासदार विशाल पाटील यांनी भाजपावर टीकास्त्र डागले.
हेही वाचा… Politics : शक्तिपीठ महामार्गावरून फडणवीसांचा इशारा; शरद पवारांनी उडवली खिल्ली
तसेच, मी जरी अपक्ष निवडून आलेलो असलो तरी काँग्रेसच्या विचाराचा आहे. काँग्रेसचा विचार सहजासहजी दाबता येत नाही. महाराष्ट्रात एकमेव अपक्ष खासदार निवडून आला, पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला. काही व्हायचे आहे ते होऊ दे, आम्हाला तुरुंगात जायला लागले, अडचणीत यायला लागल्या तरी दहा-वीस विशाल पाटील तुमच्यातून तयार होतील. थांबण्याची आमची क्षमता आहे. चूक केली असेल तर धाडसाने सामोरे जाण्याची गरज होती. कार्यकर्त्यांना स्वत:च्या संस्था बळकट करण्यासाठी लोक सोडून जात असतील, तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा विचार मजबूत आहे. मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते सामान्याला नेता बनवू शकतात, असे म्हणत खासदार पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला.
Comments are closed.