हे अंतहीन युद्ध संपले पाहिजे!
पुतिन यांच्या भेटीत नरेंद्र मोदींचा आग्रह : आलिंगन देत ब्रिक्स परिषदेचे निमंत्रण
वृत्तसंस्था/ बिश्केक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात सोमवारी एससीओ शिखर परिषदेच्या निमित्ताने किर्गिस्तानमधील बिश्केक येथे एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. मोदींनी रशिया-युक्रेन संघर्षावर तात्काळ आणि शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन करत ‘अंतहीन युद्धा’च्या पलीकडे जाऊन संघर्ष संपवण्यासाठी आता पावले उचलली पाहिजेत असे मत मांडले. त्यांनी शांततेसाठी भारताच्या निरंतर पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी युक्रेन व्यतिरिक्त व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि खत सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्यावरही चर्चा केली.
भारत आणि रशिया या दोन्ही देशाच्या नेत्यांनी युक्रेन संघर्षावर, तसेच व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील सुरू असलेल्या सहकार्यावर सविस्तर चर्चा केली. ऊर्जा आणि खत सुरक्षेसह इतर महत्त्वाचे मुद्देही चर्चेच्या केंद्रस्थानी होते. युद्धाचा प्रत्येक दिवस मानवतेला मागे ढकलत आहे. महात्मा गांधी आणि भगवान बुद्धांची भूमी असलेला भारत, शांततेसाठीच्या प्रत्येक प्रयत्नांना पाठिंबा देतो आणि यापुढेही देत राहील, असे मोदींनी स्पष्ट केले. ही बैठक पुतिन यांच्या आगामी भारत दौऱ्याच्या आणि वार्षिक ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झाली. याप्रसंगी नेत्यांनी एकमेकांना आलिंगन देत ब्रिक्स परिषदेचे आमंत्रण दिले.
एससीओ शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. ही बैठक 50 मिनिटांची होती. पुढील महिन्यात होणाऱ्या पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. याप्रसंगी भारत-रशिया संबंधांचा आढावा घेत अनेक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावर एकमत झाले. पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्यासमोर युक्रेन युद्धाचा उल्लेख करत शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या प्रत्येक प्रयत्नांना आपला पाठिंबा दर्शवला.
भारत-रशिया संबंध पूर्वीपासूनच दृढ आहेत. रशिया भारतासाठी कच्च्या तेलाचा आणि खतांचा एक प्रमुख पुरवठादार आहे. याशिवाय, भारत आणि रशिया संरक्षण क्षेत्रात प्रमुख भागीदार आहेत. भारत अजूनही मोठ्या प्रमाणात रशियन शस्त्रांचा वापर करतो. दोन्ही देश अनेक नवीन क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्यावर भर देत व्यापार अधिक वाढवण्यासाठी वेगाने काम करत आहेत. अंतराळ क्षेत्रातही रशिया भारताचा दीर्घकाळापासून समर्थक राहिला आहे.
खते, तेल व वायू खरेदीवर चर्चा
या बैठकीत तेल आणि वायू पुरवठा, खतांची उपलब्धता आणि अणुऊर्जा क्षेत्रात वाढीव सहकार्य यावर चर्चा करण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांनी लष्करी उपकरणे, सुटे भागांचा पुरवठा, तांत्रिक सहकार्य आणि संरक्षण क्षेत्रात संयुक्त उत्पादनाला चालना देण्यावरही चर्चा केली. सद्यस्थितीत दोन्ही देशांमधील व्यापार वेगाने वाढला आहे, परंतु व्यापारातील असमतोल भारतासाठी चिंतेचा विषय आहे. या बैठकीत रशियाला भारतीय उत्पादनांची निर्यात, गुंतवणूक, देयकाची व्यवस्था आणि व्यापार अधिक संतुलित करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.
Comments are closed.