मिर्झापूर येथे अपघातात 11 जणांचा मृत्यू
ब्रेक निकामी झालेल्या ट्रकची चार वाहनांना धडक : बोलेरो भस्मसात
वृत्तसंस्था/मिर्झापूर
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने हाहाकार उडवला. रेवा-मिर्झापूर राष्ट्रीय महामार्गावरील ड्रमंडगंज ख्रोयाच्या उतारावर ब्रेक निकामी झालेल्या एका भरधाव ट्रकने चार वाहनांना धडक दिल्यानंतर एका बोलेरो गाडीला आग लागली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी नऊ जण बोलेरोमध्ये जिवंत जळाले. ही आग इतकी तीव्र होती की कोणालाही वाचवता आले नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भीषण रस्ते अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी रात्री 8:30 च्या सुमारास ड्रमंडगंज खोऱ्याजवळ झाला. मध्य प्रदेशातून हरभरा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे उतारावर अचानक नियंत्रण सुटले. भरधाव वेगाने येणाऱ्या या ट्रकने समोरच्या बोलेरो वाहनाला धडक दिली. त्याचवेळी, मागून येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकचेही नियंत्रण सुटले आणि त्याने पुढे असलेल्या एका कारला धडक दिली. या अपघातावेळी काही क्षणांतच रस्त्यावर ढिगारे, आग आणि किंकाळ्यांचे एक भयानक दृश्य पसरले.
धडक बसल्यानंतर लगेचच बोलेरोच्या इंजिनला आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की, गाडीतील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. बोलेरोमधील महिला आणि मुलांसह नऊ जण जळून खाक झाले. हे सर्वजण मुलाच्या मुंडन समारंभातून परतत असल्याची माहिती देण्यात आली. या अपघातात एका कारचालकाचा आणि एका ट्रकचालकाचाही मृत्यू झाला. मृतांच्या एकूण संख्येने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस अधीक्षक अपर्णा रजत कौशिक यांच्या माहितीनुसार, बोलेरोमधील सर्व लोक प्रयागराजच्या मांडा भागातील हाटा गावचे रहिवासी होते. हे लोक मैहर धामला भेट देऊन परत येत होते. बोलेरोमध्ये किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु मृतांची संख्या आणि परिस्थितीमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती समजताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यात गुंतले होते. आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. स्थानिक रहिवाशांनीही मदत आणि बचावकार्यात हातभार लावला, परंतु आगीच्या तीव्रतेमुळे बोलेरोमधील लोकांना वाचवता आले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
Comments are closed.