'2 वर्षांची बंदी पुरेशी नाही…', बीसीसीआयवर सुनील गावस्कर भडकले; परदेशी खेळाडूंनाही लगावला टोला
आयपीएल २०२६ मध्ये जगातील अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होतात, म्हणूनच ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग मानली जाते. परदेशी खेळाडूंच्या बाबतीत बीसीसीआयने (BCCI) आयपीएलसाठी काही नवीन नियमही बनवले आहेत. नियमानुसार, जर एखादा खेळाडू लिलावात निवडला गेल्यावर आयपीएल सुरू होण्यापूर्वी आपले नाव मागे घेतो, तर त्याच्यावर २ वर्षांसाठी बंदी घातली जाईल. मात्र, सुनील गावस्कर यांना ही शिक्षा पुरेशी वाटत नाही. त्यांनी बीसीसीआयला हा नियम अधिक कडक करण्याची सूचना आणि मागणी केली आहे.
आयपीएल २०२६ च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने इंग्लंडचा खेळाडू बेन डकेट याला आपल्या संघात सामील केले होते. मात्र, डकेटने हंगाम सुरू होण्यापूर्वीच आपले नाव मागे घेतले, ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात मोठी खळबळ उडाली. कसोटी क्रिकेटला प्राधान्य देत असल्याचे सांगत त्याने हा निर्णय घेतला. आता सुनील गावस्कर यांनी या नियमात कठोर बदल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “बीसीसीआयने यावर गांभीर्याने विचार करायला हवा, कारण दोन वर्षांची बंदी स्पष्टपणे प्रभावी ठरत नाहीये. तुम्हाला अशा काही उपाययोजना कराव्या लागतील ज्याचा खरोखर परिणाम होईल. जोपर्यंत या नियमाचा खेळाडूवर आणि त्याच्या आयपीएलमधील पुनरागमनाच्या संधीवर परिणाम होत नाही, तोपर्यंत हा नियम कुचकामी ठरेल.”
दुसरीकडे, डकेटने आपल्या निर्णयाचा बचाव करताना म्हटले होते की, “इतकी मोठी रक्कम नाकारणे… हे दाखवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे की, इंग्लंडसाठी खेळणे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे.”
गावस्कर यांनी आपल्या वक्तव्यातून हे स्पष्ट केले आहे की, ते बीसीसीआयच्या २ वर्षांच्या बंदीच्या नियमावर समाधानी नाहीत. त्यांनी हा नियम अधिक कडक करण्याचा सल्ला दिला आहे. डकेटच्या आधीही अनेक परदेशी खेळाडूंनी ऐनवेळी माघार घेऊन आपल्या फ्रँचायझींना अडचणीत टाकले आहे.
Comments are closed.