आंध्रमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात २१ ठार
8 जण गंभीर जखमी; 5 किमी अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज
वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिह्यातील वेट्टलापलेम गावात शनिवारी फटाके बनवण्याच्या कारखान्यात स्फोट झाला. त्यात 21 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले. स्फोट झाला तेव्हा 20 हून अधिक कर्मचारी युनिटमध्ये काम करत होते. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज 5 किमी अंतरापर्यंत ऐकू आला. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य राबवत जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली.
अलिकडच्या काही वर्षातील हा राज्यातील सर्वात मोठा स्फोट आहे. या दुर्घटनेत कोणीही वाचण्याची शक्यता नाही. अधिकारी स्फोट आणि आगीच्या कारणाची चौकशी करत आहेत. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी संबंधित मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासन मदत आणि बचावकार्यात गुंतले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती राज्याचे गृहमंत्री वंगालपुडी अनिथा यांनी व्यक्त केली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काकीनाडा जिह्यात झालेल्या फटाक्याच्या युनिट स्फोटात 21 जणांचा मृत्यू झाला आणि 8 जण गंभीर जखमी झाले, असे आंध्र प्रदेशचे मंत्री कंदुला दुर्गेश यांनी सांगितले. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे घटनास्थळाला भेट देण्याची अपेक्षा आहे, असेही ते पुढे म्हणाले. फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटावेळी सदर युनिटमध्ये अंदाजे 30 लोक होते, असे मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मृतांपैकी सर्व कामगार गोरगरीब प्रवर्गातील असल्यामुळे वारसांना अधिकाधिक आर्थिक मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री नक्कीच घेतील, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांना दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काकीनाडा जिह्यातील फटाके उत्पादक कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर दु:ख व्यक्त केले. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये मोदींनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली. आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिह्यातील एका कारखान्यात झालेल्या स्फोटात झालेल्या जीवितहानीमुळे मी दु:खी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत, असे पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला.
Comments are closed.