साताऱ्यात हिवराच्या शेंगा खाल्ल्याने शाहूपुरीत 26 मेंढ्यांचा मृत्यू

सातारा शहरापासून जवळच असणाऱ्या निकमवाडीत फलटण तालुक्यातील मेंढपाळाच्या 26 मेंढ्यांचा हिवराच्या शेंगा खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, तसेच पुढील उपाययोजना सुरू करण्यात आल्या.

फलटण तालुक्याच्या आदर्की येथील मेंढपाळ सातारा तालुक्यात आले आहेत. मेंढ्यांच्या चाऱ्याच्या शोधात ते गावोगावी जात आहेत. असे असतानाच सातारा शहरातील शाहूपुरीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर निकमवाडी (अंबेदरे) आहे. याठिकाणी मेंढ्या चरत होत्या. त्यावेळी मेंढ्यांनी हिवराच्या शेंगा खाल्ल्या. या शेंगांचा त्रास झाल्याने जवळपास 26 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. तर हिवराच्या शेंगा खाल्ल्यानेच पाच मेंढ्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत पशुसंवर्धन विभागाला माहिती समजली. त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. तसेच जिल्हा परिषदेकडील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार हेही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तसेच पुढील उपाययोजना करण्यास सुरुवात केली.

Comments are closed.