मुंब्य्राजवळ मृत्यूचे जीवघेणे ‘वळण’, धावत्या लोकलमधून 13 प्रवासी पडले; चार प्रवाशांचा मृत्यू
‘मुंबईची लाईफलाईन’ अशी बिरुदावली मिरवणाऱया मध्य रेल्वे मार्गावर आज पुन्हा ‘मृत्यूचे तांडव’ झाले. दोन लोकल ट्रेन आजूबाजूने विरुद्ध दिशेने जात असताना या लोकलच्या दारात लटकणाऱया प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या आणि धावत्या ट्रेनमधून 13 प्रवाशी थेट ट्रकवर कोसळले. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी मुंब्रा स्टेशनजवळ ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वाधिक महसूल देणाऱया मुंबईच्या रेल्वे प्रवाशांना मेंढरांसारखी वागणूक देणाऱया रेल्वे खात्याच्या जुलुमाचे हे बळी आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया अवघ्या महाराष्ट्रातून उमटल्या.
कसाऱयाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी लोकल मुंब्रा ते दिवा स्थानकांच्या दरम्यान आली असता त्याच वेळी कसाऱयाच्या दिशेने जाणारी लोकलही विरुद्ध दिशेने आली. या दोन्ही लोकलमध्ये तुफान गर्दी होती. प्रवाशी जिवावर उदार होऊन फुटबोर्डवरून लटकत प्रवास करत होते. दोन ट्रकमध्ये कमी अंतर असलेल्या एका अत्यंत धोकादायक वळणावर या दोन्ही लोकल एकमेकांच्या जवळ आल्या असता फुटबोर्डवरून लटकत प्रवास करणाऱया दोन्ही लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या आणि दोन्ही लोकलमधून 13 प्रवाशी प्रचंड वेगात ट्रकवर फेकले गेले.
ही घटना कळताच रेल्वे पोलीस आणि अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि मुंब्य्रातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कळव्यातील काही जणांना ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. तसेच जखमींवरील सर्व उपचार शासनाच्या माध्यमातून होतील असे त्यांनी सांगितले.
पत्नी आणि मुलगी गाडीतच, आरपीएफ जवानाचा मृत्यू
दुर्घटनेत ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल विकी बाबासाहेब मुख्यदल (33) यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. विकी हे 2017 साली लोहमार्ग पोलीस दलात भरती झाले होते. त्यांची पहिली पोस्टिंग कल्याण लोहमार्ग दलात झाली होती. त्यानंतर कल्याण येथून वर्षभरापूर्वी त्यांची बदली ठाणे लोहमार्ग पोलीस दलात झाली. विकी हे कल्याण पूर्व लोकग्राम येथील सिंधू बिल्डिंगमध्ये पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलासह वास्तव्यास होते. तर त्यांचे आईवडील जालना येथे गावी राहतात.
नेमके काय घडले?
कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल सकाळी 9 वाजता मुंब्य्राच्या धोकादायक वळणावर आली. त्याच वेळी मुंबईहून कसाऱ्याला जाणारी जलद लोकल याच वळणावर आली.
मुंबईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या सॅकचा धक्का मुंबईकडे जाणाऱया लोकलमधील दारात उभ्या असलेल्या प्रवाशांना लागला.
प्रचंड वेगात असलेल्या दोन्ही लोकलमधील प्रवाशी थेट रुळावर फेकले गेले. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती प्रशासनाला मिळाली.
9 वाजून 50 मिनिटांनी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या. 10 वाजण्याच्या सुमारास जखमींना मुंब्रा रुग्णालय आणि कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आले.
अश्विनी वैष्णव राजीनामा द्या…
मुंब्य्रातील या रेल्वे अपघातानंतर जनतेच्या संतापाचा स्फोट झाला. अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री नव्हेत तर ‘रील मंत्री’ आहेत. या निष्क्रिय वैष्णवांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशी संतोष नांगरे यांनी केली. मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजार पटीने वाढली. पण त्या तुलनेत लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढल्यात का? अश्विनी वैष्णव मुंबईत येतात, पण त्यांनी कधीतरी रेल्वे स्थानकांवर जाऊन प्रवाशांची भीषण अवस्था पाहिली आहे काय? मुंबईतून तिकीट आणि पासातून करोडो रुपयांचा महसूल गोळा करायचा. पण मुंबईच्या प्रवाशांना मात्र किडय़ामुंग्यांसारखी वागणूक द्यायची. अशा निष्क्रिय रेल्वे मंत्र्याला पदावरून हाकलून द्या, अशी मागणी दिवा येथील ललित खांडेकर यांनी केली.
मृतांची नावे
राहुल गुप्ता (28, रा. दिवा), केतन सरोज (23, रा. उल्हासनगर), मयूर शहा (50), विकी बाबासाहेब मुख्यदल (34, रेल्वे पोलीस कर्मचारी)
जखमींची नावे
शिवा गवळी (23), आदेश भोईर (26, रा. आटगाव, कसारा), रिहान शेख (26, रा. भिवंडी), अनिल मोरे (40), तुषार भगत (22), मनोज सरोज (26, रा. दिवा, साबेगाव), मच्छिंद्र गोतार्णे (39, रा. वासिंद), स्नेहा धोंडे (21, रा. टिटवाळा), प्रियांका भाटिया (26, रा. शहाड)
Comments are closed.