मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, जगबुडी नदीत कार कोसळून पाच जण ठार; अंत्यविधीसाठी जाणाऱ्या मीरारोडच्या कुटुंबावर काळाचा घाला

मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबाची कार दीडशे फूट खोल नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत विवेक मोरे यांच्या कुटुंबावर काळाचा घाला पडला.

मीरा रोड येथील विवेक मोरे यांच्या देवरुखमध्ये राहणाऱ्या सासऱ्यांचे  निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण कुटुंब मुंबईहून कारने देवरुखकडे निघाले होते. भरणे जगबुडी पुलावरून उतरत असताना चालकाचे कारच्या वेगावरील नियंत्रण सुटले आणि गाडी दोन ब्रिजमधील तुटलेल्या कठडय़ामधून थेट 150 फूट खोल नदीपात्रात कोसळली. या वेळी सर्वजण झोपेत होते.  या अपघातात विवेक मोरे यांची पत्नी मिताली मोरे, मुलगा निहार मोरे व नातेवाईक श्रेयस सावंत, मेघा पराडकर आणि सौरभ पराडकर यांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने अपघातात विवेक मोरे व स्वप्नील हे दोघे बचावले आहेत. यात स्वप्नीलला गंभीर दुखापत झाली असून जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कलंबनी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते बुरहान टाके, मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, प्रतीक जाधव, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे सहकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी औटी, पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनीदेखील  घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदतकार्य सुरू केले. व्रेनच्या सहाय्याने नदीपात्रात कोसळलेली गाडी बाहेर काढणत आली. अथक प्रयत्नांनंतर गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Comments are closed.