आयटी पार्कचा झाला ‘वॉटर पार्क’, 10 मिनिटांच्या मुसळधार पावसाने हिंजवडीत रस्त्यांना नदीचे स्वरूप; वाहने बुडाली

हिंजवडी मारुंजी आयटी पार्क परिसराला शनिवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपले. आयटी पार्कच्या मुख्य रस्त्यांवर लावलेले मेट्रोचे बॅरिकेड्स आणि भूमिगत गटारे बुजविल्याने ‘डॉलर’ कंपनीसमोर डोंगरउतारावरील पाणी एकाच ठिकाणी साचले. अवघ्या 10 मिनिटांच्या मुसळधार पावसाने आयटी पार्कचा ‘वॉटर पार्क’ झाला. हिंजवडी फेज-२ परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि अनेक भागांतील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना पाच तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. काही ठिकाणी दुचाकी पाण्यात बुडाल्या.

हिंजवडी भागात 15 दिवसांपूर्वीही जोरदार पाऊस झाला होता. तेव्हाही आयटी पार्कमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. मात्र, त्यानंतरही एमआयडीसी, पीएमआरडीए आणि ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे शनिवारी झालेल्या पावसाने प्रशासनाचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले आहे. डॉलर कंपनीसमोर डोंगरावरील पाणी एकाच ठिकाणी रस्त्यावर साचले. हिंजवडी फेज-२ परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि इतर अनेक भागांतील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले.

तब्बल पाच तास वाहतूककोंडी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्थाच नसल्याचे समोर आले. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा आयटी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला. रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना तब्बल पाच तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी सव्वादहाच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे निगडी, आकुर्डी, भोसरी एमआयडीसी, लांडेवाडी, शांतीनगर, वाकड, सांगवी, दापोडीसह विविध भागांतील रस्ते जलमय झाले होते. अनेक ठिकाणी भुयारी मार्गांसह सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक संथ झाली होती. महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाण्याचा उपसा केला.

पुणे-बंगळूरु महामार्गावर ताथवडे सेवा रस्त्यावर, भूमकर चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. निगडीतील टिळक चौकाला तळ्याचे स्वरुप आले होते. पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली. भोसरीतील शांतीनगर ते इंद्रायणी कॉर्नर रस्ता, टेल्को रोडला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते.

दरम्यान, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, शहरातील विविध भागांत जोरदार पाऊस झाला. चिंचवडमध्ये 13. मिलीमीटर पावसाची नोंद झाली. भोसरी एमआयडीसी भागात इंडस्ट्रीयल वेस्ट चेंबरवर अडकल्याने पाणी रस्त्यांवर साचून राहिले. त्याठिकाणी तत्काळ पथक पाठवून पाण्याचा निचरा करण्यात आला.

12 जूनपासून जोर आणखी वाढणार

मान्सूनने आता संपूर्ण राज्यात स्थिरावण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमशान घातले आहे. मात्र, हवामान खात्याने मुंबईसाठी अतिवृष्टीचा इशारा देऊनही पाऊस पडला नाही, तर 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचेही हवामान खात्याने जाहीर केले आहे.

Comments are closed.