अपघाताची जबाबदारी रेल्वे टाळू शकत नाही; अजित पवार यांचे स्पष्ट मत

मुंब्रा- दिवा स्थानकादरम्यान झालेली रेल्वे अपघाताची घटना दुर्देवी आहे. या अपघातीची जबाबदारी रेल्वे विभागाची असून ते ती जबाबदारी टाळू शकत नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. या अपघाताबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार असून मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी पावले उचलण्यास सांगणार आहोत, असेही ते म्हणाले.

पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी पडून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या अपघाताशी पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन लोकलमधील फूटबोर्डवर लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा घासून हा अपघात झाला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडून मदत जाहीर करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्रीही मदतीची घोषणा करतील.

मुंबईतील वाढती गर्दी आणि लोकल प्रवाशांच्या समस्या गंभीर होत आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी आता पावले उचलावी लागणार आहेत. त्यासाठी आपण रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. तसेच वाढती गर्दी आणि अपघात रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. रेल्वेला मेट्रोसारखे बंद दरवाजे करण्याचा पर्यायाचा विचार होत आहे. मात्र, तो किती व्यवहार्य ठरेल, याचाही विचार करावा लागणार आहे. तसेच रेल्वेचे डबे वाढवायचे म्हणजे फलाटाची लांबी, रुंदी वाढवावी लागणार आहे. तसेच दरदोन मिनिटांनी ट्रेन असते. तसेच गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो अधिक सक्षम करण्यात येत आहेत. जलद प्रवासासाठी कोस्टल रोड आहे. मात्र, आता या अपघाताची चौकशी होणार असून त्यातून सत्य उघज होईल, असेही ते म्हणाले.

Comments are closed.