Operation Sindoor controversial statement by Nana Patole, Chandrashekhar Bawankule reply
ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम झाला होता, असे विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केल्याने एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाला आता भाजपा प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम झाला होता. भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची आधीच माहिती दिल्याने, पाकिस्तानने आपली माणसे त्या ठिकाणाहून हटवली, असे धक्कादायक विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि भाजपा यांच्यात एका नव्या वादाला तोंड फुटले असून भाजपा नेतेमंडळींनी नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांना त्यांनी केलेल्या विधानावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पटोलेंचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला असल्याची जहरी टीका बावनकुळे यांनी केली आहे. (Operation Sindoor controversial statement by Nana Patole, Chandrashekhar Bawankule reply)
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील एकूण 9 दहशतवादी तळांना भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि पाकिस्तानही नरमले. पण हे ऑपरेशन सिंदूर लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम होता, असे विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. नाना पटोलेंच्या या विधानाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असे संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते @NANA_PATOLE यांनी केले आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.” असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे.
तर, “भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणे म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही? नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे! देशाच्या जवानांचे शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि ‘भारतमाते’च्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते @RahulGandhi ही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात.” असे बावनकुळेंनी म्हटले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते @NANA_PATOLE यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 12, 2025
“‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसने दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या! नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे.” असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडाडून टीका केली आहे. त्यामुळे आता ऑपरेशन सिंदूरवरून पटोलेंनी केलेल्या विधानावरून राज्याच्या राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली असून हा वाद पेटण्याची शक्यता आहे. तर पटोलेंनी केलेल्या या विधानाबाबत काँग्रेस पक्षाकडून काय भूमिका मांडण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.