‘आदित्य चषक’ युवा राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; जळगाव-बीड लढतीचा थरार बरोबरीत; पुणे जिल्हा, मुंबई उपनगर संघ विजयी
एक एक गुणासाठी रंगलेला पाठशिवणीचा खेळ… चौफेर चढाया अन् अप्रतिम पकडी… अक्षरशः घामटा काढणाऱ्या ‘आदित्य चषक’ युवा (मुले व मुली) राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील मुलांच्या लढतीत अखेर जळगाव व बीड या मराठवाडय़ातील दोन संघांमधील थरार बरोबरीत सुटला. या लढतीत उभय संघांना विजय मिळविता आला नाही, पण कबड्डी या मर्दानी खेळाचा या परमोच्च थराराने विजय झाला, एवढं नक्की.
याचबरोबर मुलांच्या विभागात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात मुलांच्या जळगाव आणि बीड यांच्यात झालेला सामना 42-42 असा निर्धारित वेळेत बरोबरीत झाला. यामुळे दोन्ही संघांना 1-1 साखळी गुण मिळाले. मध्यंतराला बीड संघ 23-18 असा आघाडीवर होता. मध्यंतरानंतर जळगाव संघाने बीडच्या संघाला बरोबरीत रोखले. बीडच्या सोहम भागे व जयेश सपकाळे यांनी सुरेख खेळ केला. जळगावच्या जावेद खाटीक व निखिल वांद्रे यांनी जोरदार खेळ करीत आपल्या संघाला बरोबरीत नेले. पुणे शहर संघाने सोलापूर संघावर 63-32 असा विजय मिळवित आपल्या गटातील पहिला विजय मिळविला. मध्यंतराला पुणे शहर संघाकडे 32-23 अशी आघाडी होती. पुणे शहर संघाच्या रोहन बिले, आयुष पांडे, वेदांत चव्हाण, याशीर सुतार यांनी आक्रमक खेळ केला. सोलापूरच्या संग्रामसिंग सारक व सक्षम गायकवाड यांनी काहीसा प्रतिकार केला.
सकाळच्या सत्रात झालेले दोन्ही विभागांतील सामने एकतर्फी झाले. मुलांच्या गटात मुंबई उपनगर पश्चिमने ‘ग’ गटात लातूरला 63-30 असे पराभूत करीत साखळीत पहिला विजय नोंदविला. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात 3 लोण देत 35-15 अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात तोच जोश कायम राखत गुणांचे अर्धशतक पार केले. सूरज यादव, विजयनाथ पाल यांच्या चढाई पकडीच्या झंझावाती खेळामुळे हा मोठा विजय शक्य झाला. लातूरचा संतोष घवले बरा खेळला. उपनगर पहिला विजय नोंदवित असताना मुंबई शहराला मात्र पराभवाचा झटका बसला. नंदुरबारने ‘ह’ गटात मुंबई शहर पश्चिमचा 64-18 असा सहज पाडाव केला. पहिल्या सत्रात दोन लोण देत 30-अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात आणखी 3 लोण देत 46 गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. मुंबई शहर पश्चिमचा श्रेयस पुल्लरी बरा खेळला. ‘ब’ गटात पिंपरी-चिंचवडेने रायगडला 45-30 असे, तर ‘इ’ गटात ठाणे ग्रामीणने नाशिक ग्रामीणला 59-27 असे पराभूत करीत आगेकूच केली.
मुल पुणे ग्रामीण, नंदुरबार, पिंपरी–चिंचवड, रत्नागिरी, मुंबई उपनगरची आगेकूच
मुलींच्या ‘इ’ गटात पुणे ग्रामीणने पालघरला 34-21 असे पराभूत केले. पहिल्या डावात 12-09 अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याला दुसऱ्या डावात पालघरने कडवी लढत दिली. शेवटी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पुण्याने बाजी मारली. पुण्याकडून सई शिंदे, वर्षा बनसोडे, तनिषा यांच्या संयमी खेळाला जाते. पालघरच्या मनाली चव्हाण, पायल बेळकर यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यासाठी थोडा कमी पडला.
नंदुरबारने ‘ब’ गटात बीडला 32-23 असे नमविले. ज्योतिर्मय शिंदे, संगीता पाटील, वैष्णवी साबळे यांच्या जोशपूर्ण सुरुवातीने लोण देत नंदुरबारने 22-8 अशी आघाडी घेतली होती. पण विश्रांतीनंतर बीडच्या सिमरन शेख, अश्विनी कोठेकर यांनी आपला खेळ उंचावत नंदुरबारला चांगलेच जेरीस आणले. पण वेळेचे गणित न जुळल्याने पराभवाला सामोरी जावे लागले.
पिंपरी-चिंचवड संघाच्या संघाने नांदेड संघावर 58-24 असा पराभव करीत आगेकुच केली. मध्यंतराला पिंपरी-चिंचवड संघाकडे 29-9 अशी आघाडी होती. पिंपरी-चिंचवडच्या संतोषी थोरवे, डिंपल उडानदिवे, अंजली पॉल यांनी चांगला खेळ केला. नांदेडच्या श्रेया सुडेवड हिने एकाकी झुंज दिली.
रत्नागिरी संघाने सोलापूर संघाचा 50- 14 असा पराभव करीत सहज विजय मिळविला. रत्नागिरीच्या सलोनी महाडिक, सुधा शिर्पे व गौरी कांबळे यांनी सुरेख खेळ केला. सायंकाळच्या सत्रात अहिल्यानगर संघाने धुळे संघावर 59-14 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला अहिल्यानगर संघाकडे 27-5 अशी भक्कम आघाडी होती. अहिल्यानगरच्या ज्ञानेश्वरी ढवण, फौजीया शेख यांनी आक्रमक चढाया केल्या तर श्रेया अडसूळ व वीरा ढोंबरे यांनी पकडी घेतल्या. धुळे संघाच्या साक्षी परमान हिने चांगला खेळ केला.
मुबंई उपनगर पश्चिम संघाने ठाणे ग्रामीण संघावर 52-32 असा विजय मिळविला. मध्यंतराला मुंबई उपनगर पश्चिम संघाकडे साक्षी गावडे व कुमकुम सिंग यांनी जोरदार हल्ला करीत विजय साकार केला. तर ईश्वरी डोरा हिने पकडी केल्या. ठाणे ग्रामीण संघाच्या संजना विशे व श्रावणी शेलार यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
Comments are closed.