Raj Thackeray angrily reprimanded the government after the Indrayani river bridge Collapsed


इंद्रायणी नदीवरील कुंडमळा या पर्यटन स्थळावरील पूल कोसळल्याने रविवारी मोठी दुर्घटना घडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले असून सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा या पर्यटन स्थळावर रविवारी (ता. 15 जून) दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. कुंडमळा येथे असलेल्या पुलावर लोकांची गर्दी जास्त झाल्याने हा पूल कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण अद्यापही काही पर्यटक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा सरकारला या घटनेसाठी जबाबदार धरले असून अशा घटना का घडतात? सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. (Raj Thackeray angrily reprimanded the government after the Indrayani river bridge Collapsed)

इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आणि यामध्ये एकूण 4 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (ता. 16 जून) पुन्हा बचावकार्याला सुरुवात करण्यात येणार आहे. पण पुण्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. पण या घटनेला विरोधकांनी सरकारला जबाबदार धरले आहे. 30 वर्ष जूना हा पूल जीर्ण अवस्थेत असतानाही तो पूर्णतः बंद का करण्यात आला नाही? असे सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा सरकारला अनेक प्रश्न विचारत घेराव घातला आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठाकरेंनी इंद्रायणी पूल दुर्घटनेसंदर्भात प्रश्न विचारत संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा… Bridge Collapse : इंद्रायणी पूल दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना फोन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमधून नागरिकांनाही सुनावले आहे. “लोकांनी उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवे. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असे नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवे.” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. “आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साचणे, रस्त्यांची चाळण होणे, पूल पडणे अशा घटना सुरू झाल्या आहेत. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावे.” असेही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे.

राज ठाकरेंचे सरकारला सवाल…

तसेच, “हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभे आहे…’
पण मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरते बोलायचे झाले तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असे काही नियोजन करता येत नाही? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचे नियोजन करून प्रशासनाकडून कामे करून का घेता येत नाहीत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग, पण राज्याला काय उपयोग?” असे एक ना अनेक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.

राज ठाकरेंनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. “काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.” असे त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे. पण आता त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्य सरकारकडून काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





Source link

Comments are closed.