“तो माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ …..,” करुण नायरचा आर अश्विनसमोर मोठा खुलासा,

भारतीय क्रिकेटपटू करुण नायरसाठी मागील काही वर्षे अतिशय कठीण ठरली होती. मात्र त्याच कठीण काळात त्याने क्रिकेटला एक भावनिक साद घालून पुन्हा संघात स्थान मिळवले आहे. वर्ष 2022 चा शेवट हा करुणसाठी करिअरमधील सर्वात अंधारमय आणि भावनिक कालखंड ठरला. त्याच काळात त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल होतं – “डियर क्रिकेट, मला एक संधी अजून दे.”

आठ वर्षांनंतर करुण नायरची भारतीय टेस्ट संघात पुनरागमनाची कहाणी ही त्याच्या जिद्द आणि धैर्याचं जिवंत उदाहरण आहे. याच जिद्दीमुळे तो पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवू शकला आहे.

33 वर्षीय करुण नायरने माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “2022 चा शेवट माझ्यासाठी सर्वात कठीण होता. 2018 च्या तुलनेतही अधिक कठीण. मी पूर्णपणे गोंधळलेलो होतो, खूप भावनिक अवस्थेत होतो.”

2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण करताना तिहेरी शतक झळकावणाऱ्या नायरला नंतर फारसे सामने खेळायला मिळाले नाहीत. त्याने स्पष्टपणे सांगितले की, “चेन्नईत 300 धावा केल्यानंतर मला वाटलं होतं की ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि नंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत मला संधी मिळेल, पण मी त्या संघाचाही भाग नव्हतो. मला काहीच कळलं नाही की काय चाललंय.”

करुण नायरने स्पष्ट केलं की, आता तो त्या काळात परत जाऊ इच्छित नाही. “मी आता त्या तक्रारींवर मात केली आहे. मी आयुष्य जगतोय आणि मला जे आवडतं ते करत आहे,” असंही तो म्हणाला.

करुण नायर म्हणला, “माझी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चार डावांमध्ये चांगली सुरुवात होती, पण मी मोठा स्कोअर बनवू शकलो नाही. जर त्या डावांपैकी दोन डावात मी मोठा स्कोअर केला असता, तर कदाचित संघात माझं स्थान कायम राहिलं असतं.”

Comments are closed.