तीन लाख कल्याण-डोंबिवलीकरांचा लाँगमार्च मंत्रालयावर धडकणार, 27 गावांच्या वेगळ्या महापालिकेसाठी भूमिपुत्र आक्रमक

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 27 गावांचा विकास रखडला आहे. राज्य सरकारने विकासापासून वंचित ठेवलेल्या 27 गावांतील भूमिपुत्र आता आक्रमक झाले आहेत. 27 गावांच्या स्वतंत्र महापालिकेची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. यासाठी सर्वपक्षीय हक्क संघर्ष समिती स्थापन झाली असून रविवारी डोंबिवलीत मेळावा घेण्यात आला, यावेळी राज्य सरकारने 27 गावांच्या स्वतंत्र महापालिकेचा तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्रालयावर तीन लाख कल्याण-डोंबिवलीकरांचा लाँगमार्च काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
डोंबिवलीतील होराएझन हॉल येथे सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीचा मेळावा झाला. हॉलच्या प्रवेशद्वारावरच कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात प्रखर संताप व्यक्त करणारी व्यंगचित्रे लावण्यात आली होती. ‘भोंगळ कारभार’, ‘लुटारू महापालिका’, ‘दरोडेखोर कार्यशैली’ अशा चित्रांमधून महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. यावेळी बोलताना खासदार सुरेश म्हात्रे म्हणाले, 43 वर्षे आपण लढा देत आहोत. आता हा लढा निर्णायक वळणावर आला आहे. जिथे भक्ती आणि शक्ती एकत्र येतात तिथे इतिहास घडतो असे म्हणत त्यांनी उपस्थितांना एकत्र राहण्याचे आवाहन केले. 27 गावांच्या स्वतंत्र पालिकेचा प्रश्न एक वर्षाच्या आत सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मेळाव्याला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
केडीएमसीने विकासाच्या बाबतीत 27 गावांवर अन्याय केला आहे. त्यामुळे यापुढे केडीएमसीत राहायचे नाही. फक्त सभांमध्ये बोलून काही होणार नाही. लाखोंचा मोर्चा घेऊन मंत्रालयावर जावे लागेल असे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी पलावा पुलाचे नाव स्थानिक तीन गावांची नावे एकत्र करून द्यावे अशी मागणीही केली. – दीपेश म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख
शिंदे गटाचे आमदार नामधारी
मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी 27 गावांचा विकास भाजप आणि शिंदे गटामुळे रखडल्याचा आरोप केला. कल्याण ग्रामीणचे आताचे आमदार काही करत नाहीत. कारण त्यांच्या हातात काही नाही. ते केवळ नामधारी आहेत असे म्हणत त्यांनी शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचा शेलक्या भाषेत समाचार घेतला.
Comments are closed.