पाऊस पावला! पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला!! गेल्या वर्षीपेक्षा 19 दिवस आधीच ‘ओव्हरफ्लो’

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव बुधवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. गेल्या दोन दिवसात तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे. सद्यस्थितीत तलावाची पाणी पातळी 195.10 फूट इतकी आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती

– बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 27 किलोमीटर (सुमारे 17 मैल) अंतरावर हा तलाव आहे.

– या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन 1890 मध्ये पूर्ण झाले.

– या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

– या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असते.

– तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये 545.5 कोटी लीटर पाणी असते. (5455 दशलक्ष लिटर)

– हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

Comments are closed.