आता पाण्याचे नो टेन्शन, रायगड जिल्ह्यातील 9 धरणे ओव्हरफ्लो
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे 9 धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना आता पाण्याचे नो-टेन्शन असून पावसाने बळीराजावरदेखील कृपादृष्टी केली आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. दोन धरणांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक तर पाच धरणांमध्ये 50 ते 75 टक्क्यांच्या दरम्यान पाणी साठा जमा झाला आहे. मात्र उर्वरित बारा धरणांमध्ये अजूनही 50 टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. ही धरणेदेखील येत्या काही दिवसांत भरतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाच्या मुसळधार सरी बरसत आहेत. पावसाने सरासरी गाठली नसली तरी जिल्ह्यातील लघु पाठबंधारे विभागाच्या ताब्यात असलेल्या २८ धरणांमधील पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र अद्यापही १२ धरणांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणी साठा जमा झाला आहे. पावसामुळे रायगडच्या नागोठण्यातील अंबा तसेच रोह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी येत्या काही दिवसांत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पूर्ण क्षमतेने भरलेली धरणे सुतारवाडी, उन्हेरे, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, भिलवले, कोडगाव, कोथुर्डे, खैरे.
75 ते 99 टक्के पाणीसाठा जमा असलेली धरणे: फणसाड, वावा.
50 ते 75 टक्के पाणीसाठा जमा असलेली धरणे कार्ले, कुडकी, अवसरे, कलोते-मोकाशी, डोणवत.
50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेली धरणे : आंबेघर, श्रीगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, रानिवली, साळोख, मोरबे, बामणोली, उसरण, पुनाडे, वरंध
पावसाचा लेखाजोखा
रायगड जिल्ह्यात दिवसभरात ६३.१७ मिमी एवढा सरासरी पाऊस पडला. अलिबाग तालुक्यात ९९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर मुरुड ६५, पेण ९७, पनवेल ८८.६, उरण ९८, कर्जत -५३, खालापूर – ६९, माथेरान ११४.६, सुधागड ८०, माणगाव -४३, तळा – ५९, महाड ३१, पोलादपूर २९, श्रीवर्धन १३, म्हसळा – ३१, रोहा – ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Comments are closed.