Harshwardhan Sapkal attacks RSS and BJP


(Language controversy) मुंबई : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात त्रिभाषी सूत्र अनिवार्य करण्यात आले. त्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली. पण त्याला कडाडून विरोध झाल्यावर सरकारने एक पाऊल मागे घेतले. आता नवा जीआर जारी करून मराठी आणि इंग्रजी सक्तीची तर, तिसरी भाषा पर्यायी ठेवली आहे. पण मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी अप्रत्यक्षपणे ही हिंदीचीच सक्ती आहे. त्यावरून सर्व पक्ष आक्रमक झाले आहेत. ‘एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती’ हा राष्ट्रीय स्वयंसेवक सघं आणि भाजपचा अजेंडा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. (Harshwardhan Sapkal attacks RSS and BJP)

राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे सक्तीचे करण्यात आले आहे. दुसरी भाषा इंग्रजी तर, तिसरी भाषा पर्यायी ठेवण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हे धोरण लागू करण्यात आले आहे. हिंदीव्यतिरिक्त अन्य कोणतीही भारतीय भाषा घेतल्यास त्यासाठी विद्यार्थी संख्या 20 असणे आवश्यक आहे. तेवढी नसल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे शासनाने म्हटले आहे. मात्र, या नव्या धोरणालाही विरोध केला जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि मायमराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला आहे. ‘तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली,’ असे सांगून जनतेची फसवणूक केली गेली. पण सरकारचा जीआर काय सांगतो? हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार आहे. इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान 20 विद्यार्थ्यांची अट आहे. म्हणजेच, पर्यायाचा देखावा आणि हिंदी लादण्याचा ठरवलेला कट! हा भाजपाचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच असून हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना संपवण्याचे कारस्थान आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची निष्ठा ही महाराष्ट्राशी, मराठी माणसांशी नव्हे तर दिल्लीश्वरांशी आहे हेच यातून स्पष्ट होते. तर, वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेणाऱ्या शिंदे गटाकडेच शिक्षण खाते असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तशाच प्रकारे मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

अजित पवार सत्तेसाठी इतके लाचार आहेत की त्यांना तर महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस जगले काय, मेले काय? याच्याशी काही देणे-घेणे नाही. फक्त आपल्याला अर्थखातं मिळावे हेच अजित पवारांचे धोरण आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. संघ आणि भाजपाचा हा ‘एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती’चा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठला असून तो झुगारून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.



Source link

Comments are closed.