Ambadas Danve’s open letter to Shiv Sainiks members
(Shiv Sena Anniversary) छत्रपती संभाजीनगर : सरकार राज्याचे असो वा केंद्राचे… जनतेच्या मुद्द्यांवर सरकारला घाम फोडून आपल्याला आपला दरारा कायम ठेवायचा आहे. आपल्याकडे अनेक पराक्रम करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचा एक आदर्श कर्णधार आहे. त्यांचा दरारा उभ्या जगाने पाहिला आहे. आपण त्यांचे बछडे आहोत, आपल्याला कोणाचे कसले भय? आपल्या मुळावर उठणाऱ्या प्रत्येकाचा हिशेब आपल्यालाच करावा लागणार आहे. अगदी आपल्यातून गेलेल्या कृतघ्न लोकांचाही, असा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. (Ambadas Danve’s open letter to Shiv Sainiks members)
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज, गुरुवारी 59वा वर्धापन दिन आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केले असले तरी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या पक्षावरील दावा कायम आहे. त्यामुळे आज, गुरुवारी दोन्ही पक्षांचे वर्धापनदिन साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांसाठी खुले पत्र लिहिले आहे.
शिवसैनिकांना खुले पत्र
सर्वप्रथम शिवसैनिकांना आजच्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ज्या ज्ञात अज्ञातांनी ‘शिवसेना’ या चार अक्षरांना धर्म मानून महाराष्ट्राची सेवा केली, करत आहेत त्या सर्वांना विनम्र अभिवादन.
महाराष्ट्राचे राजकारण आज गढूळ झाले आहे. निष्ठेला विकत घेण्यासाठी… pic.twitter.com/4vRprwSL3f
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 18, 2025
महाराष्ट्राचे राजकारण आज गढूळ झाले आहे. निष्ठेला विकत घेण्यासाठी आमिषाचे अक्षरशः बाजार भरवले जात आहेत. आपण छातीठोकपणे सांगू शकतो की, होय.. बाळासाहेब ठाकरे आमच्या संघटनेचा बाप आहे. गद्दार गटाने हे हे शब्द उच्चारले तर दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा डोळे वटारतात. चतकोरीच्या बदल्यात खाल्ल्या मिठाला न जागणाऱ्या या गद्दारांना सूर्याजी पिसाळ म्हणावे, खंडोजी खोपडे म्हणावे की अजून काही, हे काळ ठरवेल…, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
आपली बांधिलकी जनतेशी आणि ‘मातोश्री’शी आहे. तेच मातोश्री ज्यात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा बदलण्याचा जिगर आहे. आज शेतकरी, सामान्य माणूस, महिला आणि अगदी लहान लेकरांचे भविष्य या सरकारने अधांतरी लटकवून ठेवले आहे. भोवताली हजार प्रश्न आहेत ज्यांच्यावर आपल्याला लढण्याचे बळ मिळत राहील. हे प्रश्न हाती घेऊ, आंदोलनांचे रान उठवू आणि लोकांचे प्रश्न धसास लावू. सत्ताधारी शिवसेनेपुढे नाही झुकणार तर कोणापुढे झुकणार? असे सांगत त्यांनी शिवसैनिकांना प्रोत्साहन दिले आहे.
यासंदर्भात त्यांनी 1983च्या क्रिकेट विश्वचषकाचेही उदाहरण दिले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस अगोदर, म्हणजे 18 जून 1983 रोजी हिंदुस्थान-झिम्बाब्वे हा सामना इंग्लंडच्या टनब्रिज मैदानावर झाला होता. हिंदुस्थानी टीमच्या 17 धावांवर 4 विकेट गेलेल्या असताना कर्णधार कपिल देव खेळण्यासाठी आले. कपिल देव यांनी धुवांधार खेळ करत संघाची धावसंख्या 266 या सन्मानजनक आकड्यापर्यंत नेली. केवळ सामना आपल्या टीमला जिंकूनच नाही दिला तर 138 चेंडूत 175 धावांचा नवा विश्वविक्रम करून दाखवत मैदानावर आपला दरारा कायम केला. एवढ्यावर न थांबता कोणालाही विश्वास नसताना आपल्या टीमने महाकाय वेस्टइंडिजची सद्दी मोडत विश्वविजेतेपदाला गवसणी घाण्याचा अविश्वसनीय पराक्रम त्यांच्याच नेतृत्वात केला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
आज प्रत्येक शिवसैनिकांत स्वतःवर विश्वास असणारा असा एक कर्णधार कपिल देव पाहतो. फरक एवढाच आहे की, ते क्रिकेटच्या मैदानावर खेळले, आपण राजकीय पटलावर आहोत. आपला दरारा ही आपली ताकद आहे. तो तसूभरही कमी होता कामा नाही. गल्ली ते दिल्ली तो असलाच पाहिजे! सत्ता आपोआप आपल्या मागे फरफटत येईल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – Jayant Patil : पक्षांतरासाठीच भेटलो असेल…; भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
Comments are closed.