IND vs ENG: ‘शुबमनसाठी हे अजिबात सोपं नसणार आहे', इंग्लंडविरुद्ध मालिकेपूर्वी शास्त्रींचा कर्णधार गिलला महत्त्वाचा सल्ला!

शुबमन गिलसाठी (Shubman gill) कर्णधार म्हणून ही मालिका अजिबात सोपी नसणार आहे. हे म्हणणं माजी भारतीय खेळाडू आणि माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी केलं आहे. भारतीय क्रिकेट टीम इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे, ज्याचा पहिला सामना शुक्रवार 20 जून रोजी सुरू होईल. मागच्या 18 वर्षांमध्ये टीम इंडिया इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. आता या दौऱ्यासाठी रवी शास्त्री यांनी कर्णधार गिल आणि संपूर्ण संघाला सल्लादेखील दिलेला आहे.

आयसीसी रिव्यूमध्ये रवी शास्त्री यांनी शुबमन गिलविषयी बोलताना म्हटले, या युवा कर्णधाराला सर्वात आव्हानात्मक भूमिकांमधील एक भूमिका निभावण्यासाठी धैर्य आणि संयमाची गरज आहे. शास्त्री यांनी गिलला महत्त्वाचा सल्ला देत म्हटले, मला वाटते की त्याने त्याचा वेळ घेतला पाहिजे. हे अजिबात सोपे नसणार आहे, त्याला इंग्लंडमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळण्याची महत्त्वाची आणि अवघड जबाबदारी देण्यात आलेली आहे.

इंग्लंडमध्ये शुबमन गिलने या आधी एकूण तीन कसोटी सामने खेळले आहेत. 6 डावांमध्ये त्याच्या नावावर फक्त 88 धावा आहेत. त्याने एकूण 32 कसोटी सामन्यांच्या 59 डावांमध्ये 1893 धावा केल्या आहेत.

इंग्लंडची खेळपट्टी नेहमीच अनुभवी खेळाडूंची परीक्षा घेते. आता हे पाहणे महत्त्वाचे असेल की, कर्णधार गिलचे करिअर कशा पद्धतीने सुरू होणार. ते सुद्धा तेव्हा जेव्हा विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) सारखे दिग्गज संघामध्ये नसणार आहेत. भारताने 2007 नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही.

शास्त्री यांचं म्हणणं आहे की, हा दौरा युवा खेळाडूंच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. ते पुढे म्हणाले, हे कधीच सोपे नसणार आहे पण मला वाटते की खेळाडू इंग्लंडमध्ये खेळून अनुभव घेतील आणि शिकतील. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या कर्णधाराच्या रूपामध्ये मी त्याला पाहिले आहे. तो शांत होता, संयमित होता आणि त्याचा स्वभाव सुद्धा चांगला आहे.

तो एक माणूस म्हणून सर्वगुण संपन्न आहे. त्याच्यासोबत काही युवा खेळाडू आहेत आणि मला वाटते की जिथपर्यंत शुबमन गिलविषयी गोष्ट आहे, तर त्याच्यासाठी ही शिकण्याची खूप मोठी संधी असणार आहे.

Comments are closed.