देशी खेळांना राजाश्रयाची गरज, आदित्य चषक स्पर्धेतील विजेत्यांचा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याकडून गौरव

‘आज जग क्रिकेटच्या मागे धावतंय. मात्र आपल्या देशी आणि मातीतल्या पारंपरिक खेळांकडेही लक्ष देणं, त्यांना राजाश्रय देणं गरजेचं आहे. कबड्डी हा आपल्या मातीतला आणि लढणाऱ्यांचा खेळ आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पारंपरिक क्रीडा स्पर्धांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

‘आदित्य चषक युवा (मुले व मुली) राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धे’च्या पारितोषिक वितरण समारंभासाठी शिवसेना नेते संजय राऊत बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना नेते, माजी मंत्री अनिल परब, उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शिव सहकार सेनेचे बाळासाहेब भांडे, युवा सरपंच, युवासेनेचे उपशहरप्रमुख मयूर भांडे आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचा शहर, जिल्हा शिवसेना पक्ष आणि बाणेर नागरी पतसंस्था, शिवशक्ती महिला संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, आजही ग्रामीण भागात कबड्डीला मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मुंबईतील गिरणगावामध्ये तर कबड्डी सामने पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. इथे उपस्थित बाबूराव चांदेरे हे उपाध्यक्ष आहेत. सर्वांनी मिळून कबड्डीसारख्या देशी खेळांना उत्तेजन देण्याची गरज आहे.

‘आदित्य चषक’ युवा कबड्डी स्पर्धेसारखी स्पर्धा ही एक तरुणांसाठी चांगली संधी असल्याचे सांगून आमदार सचिन अहिर आणि त्यांच्या टीमने ग्रामीण तरुणांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत, ते निश्चितच स्तुत्य आहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सचिन अहिर आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.

‘शिवसेना ही लढणाऱयांची संघटना, कबड्डी लढणाऱ्यांचा खेळ’

‘कबड्डी हा लढणाऱ्यांचा खेळ आहे आणि शिवसेना ही लढणाऱ्यांची संघटना आहे. त्यामुळे अशा खेळांना आणि खेळाडूंना प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे, हे आमचे काम आहे. गिरणगावात आजही कबड्डीला प्रचंड प्रतिसाद मिळतो, हा उत्साह इतर ठिकाणीही वाढायला हवा,’ असे संजय राऊत यांनी सांगितले.

पुणे ग्रामीण, परभणीला विजेतेपद

मुलींमध्ये पुणे ग्रामीण संघाने, तर मुलांमध्ये परभणी संघाने पहिल्या ‘आदित्य चषक युवा (मुले व मुली) राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धे’त विजेतेपदावर आमचे नाव कोरले. मुलींच्या गटात पिंपरी-चिंचवड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर मुलांच्या गटात संभाजीनगर संघ उपविजेता ठरला.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती महिला संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीणने पिंपरी-चिंचवड संघाचा प्रतिकार चुरशीच्या लढतीत 33-32 असा मोडून काढत जेतेपद पटकाविले. आक्रमक सुरुवात करीत पिंपरी-चिंचवडने पहिला लोण देत 12-03 अशी जोरदार मुसंडी मारली होती.

पूर्वार्धात पिंपरी-चिंचवडकडे 17-07 अशी आघाडी होती, मात्र उत्तरार्धात डाव पलटी झाला. पुणे ग्रामीण संघाने जोरदार पुनरागमन करीत शेवटच्या काही मिनिटांत 24-24 अशी बरोबरी साधली. शेवटी लोण देत 28-26 अशी आघाडी घेत एका गुणाने बाजी मारली. वर्षा बनसोडे, सई शिंदे यांच्या कल्पक चढाया, त्यांना सानिका वाकसेची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. संतोषी थोरवे, कार्तिक घेरवे यांच्या चढाया उत्तरार्धात कमी पडल्या. सानिका पांडुरे हिचा बचावही कमी पडला, म्हणून पिंपरी- चिंचवडला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.

मुलांच्या अंतिम सामन्यात परभणीने संभाजीनगर संघाचा 41-21 असा सहज पराभव करीत जेतेपदावर आपले नाव कोरले. विश्रांतीपर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात परभणीकडे 18-12 अशी आघाडी होती. पूर्वार्धात एक व उत्तरार्धात दोन लोण देत परभणीने हा विजय सोपा केला.

याअगोदर झालेल्या मुलींच्या उपांत्य सामन्यात पिंपरी-चिंचवडने मुंबई उपनगर पूर्वचे आव्हान 30-25 असे संपविले. मध्यंतरापर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात 16-12 अशी आघाडी पिंपरी-चिंचवडकडे होती. ज्ञानेश्वरी लांडे, संतोषी थोरवे, डिंपल यांनी पिंपरी-चिंचवडकडून, तर तन्वी बारगडे, भैरवी म्हात्रे, पूजा चिंदरकर यांनी उपनगरकडून उत्कृष्ट खेळ केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुणे ग्रामीणने जालन्याला 32-19 असे नमवित अंतिम फेरी गाठली होती. मुलांच्या उपांत्य सामन्यात परभणीने पिंपरी-चिंचवडला 48-37 असे, तर संभाजीनगरने जळगावला 40-37 असे नमवित अंतिम फेरीत धडक दिली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खासदार व दैनिक ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांच्या हस्ते पार पडला.

Comments are closed.