हिंदी भाषा सक्तीची करू नका; शरद पवार यांची प्रतिक्रिया, महापालिका निवडणुकीवरही भाष्य

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी नवा जीआर काढून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा अनिवार्य करून त्यात हिंदीचा समावेश केला. तिसरी भाषा म्हणून हिंदीव्यतिरिक्त भाषा शिकायची असल्यास 20 विद्यार्थ्यांचा गट असणे आवश्यक करण्यात आले आहे. हिंदी भाषेसाठी मात्र ही अट नाही. त्यामुळे हिंदीव्यतिरिक्त भाषेला शिक्षक मिळणार नसल्याचेही स्पष्ट होत आहे. ही एक प्रकारे हिंदीची सक्तीच असून यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शुक्रवारी सकाळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना हिंदी सक्तीबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती करू नका. तुम्हाला जे हवे ते करा पण हिंदी भाषा सक्ती करू नका. पालकांनी जे मार्गदर्शन केले आहे त्या प्रमाणे निर्णय घ्या, असेही त्यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांनी हिंदी भाषेचा द्वेष करणेही विद्यार्थ्यांच्या हिताचे नसल्याचे म्हटले. हिंदुस्थानातील 55 ते 60 टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही शरद पवार यांनी भाष्य केले. पुढील तीन महिन्यात निवडणुका होतील असे त्यांनी म्हटले. तसेच महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.
महापालिका एकत्र लढण्याची इच्छा
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता निवडणुका लांबणार नाहीत. साधारण तीन महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल, असे पवार म्हणाले. तसेच महाविकास आघाडीत अद्याप चर्चा झालेली नाही. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व इतर छोटे पक्ष एकत्र बसू आणि एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाता येईल का याबाबत विचार करू. आमची एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा आहे. तसेच मुंबईमध्ये आमच्यात शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यामुळे त्यांना विचारात घ्यावे लागेल, अशी स्पष्ट भूमिका पवारांनी मांडली.
Comments are closed.