Sanjay Raut reply to Eknath Shinde criticism of Uddhav Thackeray


गुरुवारी दोन्ही शिवसेना पक्षाचे वर्धापन दिनाचे मेळावे पार पडले आहेत. या मेळाव्यातून दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका केली. पण उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : गुरुवारी (ता. 19 जून) दोन्ही शिवसेना पक्षाचे मेळावे पार पडले. शिवसेना पक्षाला 59 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने शिवसेना ठाकरे गटाने षण्मुखानंद हॉल येथे आणि शिवसेना शिंदे गटाने वरळी डोम येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी Come On Kill Me.. असे म्हणत शिंदे गटाला आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानाला शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेलेल्यांना काय मारणार, असे म्हटले. त्यामुळे या दोन्ही पक्षात आणखी एका वादाला सुरुवात झाली आहे. पण शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या प्रत्येक शब्दांची आमच्याकडे नोंद आहे, त्यामुळे जशास तसे उत्तर देऊ असे म्हणत राऊतांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut reply to मराठी criticism of Uddhav Thackeray)

षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान दिले. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या आणि मला मारा, कम ऑन किल मी… पण येताना एम्बुलन्स घेऊन या. कारण तुम्ही येणार सरळ पण तुम्हाला आडवे करून आम्ही पाठवणार. ठाकरेंनी दिलेल्या या आव्हानाला शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, कदाचित इंग्रजी चित्रपट पाहून आले असावेत. पण मला एक सांगायचे आहे की, मेलेल्यांना काय मारायचे. कारण महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत यांचा मुडदा पाडलेला आहे. ते म्हणाले की मारायला आलात तर एम्बुलन्स घेऊन या. पण यांना काय बोलायचे. पण नुसता करून शोर मनगटात येत नाही बळ, हे लक्षात ठेवा. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो, असे म्हणत ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. पण आता त्यांच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा… Bawankule on Thackeray : जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. 20 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोण मेलं आहे आणि कोण जिवंत आहे, हे येणारा काळ ठरवेल. लोकसभेत तुम्ही मेला होतात, विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात. भविष्यात तुम्हाला राज्यातील जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते हे कळेल. पण उद्धव ठाकरेंबाबत वापरलेल्या शब्दांची नोंद आम्ही केली आहे. याचे त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराच राऊतांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता राऊतांच्या या इशाऱ्याला शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Comments are closed.