चर्चगेट-विरार लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी; जागेच्या वादातून वाद विकोपाला, डोक्यात मोबाईल
विरार : काल दिवसभर एक व्हिडीओ सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जोरदार चर्चेत आला होता. तो व्हिडिओ होता लोकल ट्रेनमधील. लोकलमध्ये दोन महिलांमध्ये झालेले वाद आणि मारामारी यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. चर्चगेट होऊन विरारला निघालेल्या लोकल ट्रेनमध्ये दोन महिलांची तुंबळ हाणामारी झाली ही हाणामारी एकमेकींचे डोके फोडून रक्त बाहेर निघण्यापर्यंत झाली. या घटनेमध्ये एक महिला रक्तबंबळ झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसून आलं. ही घटना मिरारोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान 17 जून रोजी सायंकाळी घडली होती. प्राथमिक माहितीनुसार, जागेच्या वादातून दोघींमध्ये वाद सुरू झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. प्रवाशांनी घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला, नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकाराची दखल घेतली गेली आहे.या घटनेत जखमी झालेली महिला कविता मेदाडकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला आहे.
थोडं पुढे जा म्हणाल्याने वाद…
या घटनेत जखमी झालेली महिला कविता मेदाडकर यांनी त्या घटनेबाबत एबीपी माझाशी संवाद साधताना नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. कविता मेदाडकर म्हणाल्या, रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. 7.57 ची लेडीज स्पेशल लोकल आहे. ही लोकल जेव्हा थांबते तेव्हा काही महिला आम्हाला आतमध्ये चढू देत नाहीत. त्या दरवाजामध्येच थांबतात. आम्हाला अजिबात पुढे जाऊ देत नाहीत. मी त्या महिलेला बोलले की थोडं पुढे जा, भाईंदरची गर्दी कमी झाली की मी पुढे जाते. तर तिने माझ्या डोक्यात काहीतरी धारदार मारलं. मी कशीबशी लोकलच्या आतमध्ये गेले. त्यावेळी दुसऱ्या महिलांनी पण मला सावरलं. त्यानंतर मी आतमध्ये जाऊन मला मारलं म्हणून त्या महिलेचे केस धरले. आम्ही दुसऱ्यांचा मार खायला जन्माला आलेलो नाही. मी पण तिला केस धरून मारलं. तिने पुन्हा माझे केस पकडून माझ्या कपाळावरती मोबाईलने मारलं.ती मराठीमध्ये खूप शिव्या देत होती. घाणेरडे शब्द देखील बोलत होती. मी किती सहन करणार, त्यानंतर मी पण तीला प्रतिकार केला.
लोकलमध्ये महिलांमध्ये जुंपली,व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, हा व्हिडीओ कधीचा आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही | Viral Video #मुंबई #लोकल #Video #गुन्हे pic.twitter.com/syn8kttfsi
– अंकीता शांतीनाथ खाने (@khaneankita) 20 जून, 2025
पोलिसांनी तिच्याकडून पाच हजार रुपये घेतले
पुढे त्या म्हणाल्या, बाकीच्या महिलांनी मिळून तिला खाली उतरवली. त्यानंतर मला त्यांनी उतरायला सांगितलं आणि पोलिसांकडून कारवाई झाली. तिला लेडीज पोलिसांनी पण तिला थोडं मारलं. तिच्याकडून दंड म्हणून पाच हजार रुपये घेतले. या घटनेत माझं मंगळसूत्र देखील तुटलं. पोलिसांनी तिच्याकडून पाच हजार रुपये घेतले. मला दोन हजार रुपये दिले आणि स्वतःकडे तीन हजार रुपये ठेवले. त्यानंतर रेल्वेच्या इथे मला ड्रेसिंग वगैरे केलं. त्यानंतर मी घरी आले. भाईंदरची एक मुलगी होती ती माझ्यासोबत मला सोडायला आली. जेव्हा कारवाई सुरू होती, तेव्हा देखील ती माझ्यासोबत होती. पोलिसांनी रेल्वे पोलिसांनी आधी मला सांगितलं होतं केस करा म्हणून पण नंतर ते मला घाबरायला लागले. आपल्याला या गोष्टींची सवय नाही. त्यामुळे मी पण घाबरले. त्यानंतर मग मी सांगितलं मला पुढे केस नाही करायची. कारण माझ्यासोबत उभे राहणार कोणी नाही. रेल्वे पोलिसांनी सांगितलं, तुला कोर्टामध्ये बोलवलं जाईल, तुझ्याकडून पैसे मागितले जातील. सर्व मॅटर चालू होतील. त्यानंतर मग मी ही विषय सोडून दिला तिला देखील पोलिसांनी असंच काहीतरी सांगितलं आणि ती पण बाहेर गेली. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मला रेल्वेतून फोन आले, असंही कविता यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
माझ्या घरामध्ये माहिती देखील नाही
त्या पुढे म्हणाल्या, मी रोज विरार ते मिरा रोड असा प्रवास करते. नेहमी मी पुढचा डबा पकडते पण काल चुकून मी मागचा डबा पकडला. माझ्या पायाला लागलं होतं. त्यामुळे मी पुढे जाऊ शकले नाही. त्या लोकलमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रुपबाजी होते. ते ग्रुपने दरवाजात उभे राहतात आणि ते दरवाजा पॅक करतात. कोणाला वरती चढू देत नाहीत, जर कोणी आतमध्ये घुसला तर त्यांच्याशी अरेरवी करतात. मला ती घटना आठवली तरी चिड येते. पण, माझ्या मुलांकडे बघून मी दिवस पुढे ढकलते. मुलांना वाटायला नको मम्मीला लागले म्हणून मी कामावर जाते. माझ्या घरामध्ये माहिती देखील नाही की मला कोणीतरी मारलं आहे. मी सांगितलं आहे मी पडले आहे. मी तक्रार दाखल करणार नाही. कारण मी आयुष्यात कधीही तक्रार दाखल केलेली नाही, असे या घटनेत गंभीर झालेल्या कविता मेदाडकर यांनी म्हटला आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना मिरारोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान 17 जून रोजी सायंकाळी घडली होती. प्राथमिक माहितीनुसार, जागेच्या वादातून दोघींमध्ये वाद सुरू झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. प्रवाशांनी घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. सायंकाळी 7.32 वाजता लोकल भाईंदर स्थानकात दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही महिलांना गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर त्यांच्या चौकशीदरम्यान जागेच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले. या घटनेबाबत दोघींपैकी कुणीही तक्रार न दाखल केल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, अशी माहिती वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली आहे.
कविता मेदांडकर असे जखमी महिलेचे नाव असून या विरार पूर्व फुलपाडा येथे राहतात आणि मिरारोडला त्या रोज कामाला जातात. 17 जुन रोजी काम संपवून रात्री मीरारोड वरून त्यांनी महिला लोकल पकडली होती ती 7.32 ला भाईंदर स्थानकात आली होती. मिरारोडला चढताना गेटवर उभ्या असणाऱ्या तरुणी बाजूला होत नसल्यामुळे यात या दोघीची वादावादी झाली. तेव्हा त्यांच्या डोक्यात काही तरी तिक्ष्ण तसेच मोबाईल मारून त्यांना रक्तबंबाळ करण्यात आले आहे. भाईंदर रेल्वे स्थानकात पोलिसांनी महिलेला मदत केली पण मदत करताना तक्रार देण्यासाठी पोलिसांनीच त्यांना घाबरविले. त्यामुळे त्यांनी तक्रार दिली नाही आणि गळ्यातील त्यांच्या मंगळसूत्र तुटले असल्याने मारहाण करणाऱ्या महिलेकडून पाच हजार रुपये घेतले आणि त्यातील त्यांना फक्त दोन हजार दिले असल्याचा आरोप ही त्या महिलेने केला आहे. या घटनेमुळे मारहाण झालेली महिला घाबरली आहे. विरारहून लोकल पकडणाऱ्या महिलांना खूप त्रास होतोय. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी विनंती ही त्यांनी करत जे माझ्यासोबत झाले ते दुसऱ्या महीले सोबत होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, महिला लोकलमध्ये प्रवाशांमध्ये होत असलेले वाद, त्यातून होणाऱ्या मारहाणीच्या घटना चिंताजनक असून, रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी महिला प्रवासी करत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=i5dkgqzaufy
आणखी वाचा
Comments are closed.