Maharashtra Weather Meteorological Department issues alert for Konkan and Western Maharashtra districts


गेल्या 24 तासांमध्ये म्हणजेच शुक्रवारी (ता. 20 जून) रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 41.7 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे आता कोकणातील अनेक भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पूरपरिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईसह आजुबाजूच्या जिल्ह्यांत विश्रांती घेतली आहे. पण भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच, राज्यातील काही नद्यांना पूर आल्याने त्या ठिकाणावरील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Meteorological Department issues alert for Konkan and Western Maharashtra districts)

गेल्या 24 तासांमध्ये म्हणजेच शुक्रवारी (ता. 20 जून) रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 41.7 मिमी पावसाची नोंद झाली. तर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही 41.6 मिमी, रायगडमध्ये 40.1मिमी आणि मुंबई उपनगरात 31.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीतील खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी आल्याने काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गोदावरी नदीसह अनेक नद्यांना पूर आला असून धरणांमधील जलसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाच्या या जोरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पण दुसरीकडे मात्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाचा अनुभव येईल. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

हेही वाचा… MHADA Konkan Mandal : म्हाडाची मोठी घोषणा; शिरढोण, खोणी येथील सदनिकांची किंमत एक ते दीड लाखांनी कमी

हवामान विभागाने पुणे घाट परिसरात शनिवारी (ता. 21 जून) मध्यरात्रीपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक आदी घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये येत्या 23 आणि 24 जून रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 21 जून रोजी पावसाची शक्यता असली तरी 22 जूननंतर या भागांत पावसाचा जोर कमी होईल. नांदेड, परभणी, हिंगोलीसह अन्य काही जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता आहे.



Source link

Comments are closed.