निकटवर्तीयांमुळेच मुख्यमंत्र्यांचे कारागृह घोटाळ्यावर पांघरूण, राजू शेट्टी यांचा आरोप

राज्याच्या कारागृहातील 500 कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे अनेक कारनामे उघडकीस आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या तेजस मोरे याच्यासोबत सुपेकरांचे कनेक्शन असल्यानेच फडणवीस यांनी कारागृह घोटाळ्याच्या प्रकरणावर पांघरूण घातल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्यातील कारागृहात तीन वर्षांत सुमारे 500 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप राजू शेट्टी यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री, मुख्य सचिव व गृहसचिव यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची लेखी मागणी केली होती. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे या प्रकरणावर भेटीसाठी वेळ मागितला असता, त्यांनी भेट देण्यास टाळाटाळ केली आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव व गृहसचिव यांची भेट घेतली असता, त्यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. सध्या राज्याच्या प्रशासनात मुख्य सचिव यांच्यानंतर मुख्यमंत्री हेच राज्याचे प्रमुख व वरिष्ठ असून, त्यांनी या घोटाळ्याच्या चौकशीबाबत टाळाटाळ करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तेजस मोरे हा कोणताही अधिकारी व ठेकेदार नाही; पण कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रशासनातील अनेक कामे मार्गी लावण्याचे काम करीत आहे. त्याच्यावर याआधी फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असतानाही त्याचा मंत्रालयात वावर असतो.
तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर तसेच पुणे कार्यालयातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी सत्यवान हिंगमिरे, तुरुंग अधीक्षक प्रशांत मत्ते, जेलर शाहू विभूषण दराडे, लेखनिक गौरव जैन, सुनील ढमाळ, अधीक्षक येरवडा कारागृह, अतुल पट्टेकरी क्लार्क येरवडा कारागृह या सर्वांची, तसेच त्यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी यावेळी केली.
Comments are closed.