पूर संकटात ओडिशामधील बालासोर
वृत्तसंस्था / भुवनेश्वर
ओडिशा राज्यातील बालासोर जिल्हा पुराच्या संकटात अडकला आहे. मान्सूनचा प्रचंड पाऊस या राज्यात कोसळत आहे. बालासोर जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर झाला आहे. या जिल्ह्याच्या 16 क्षेत्रांमध्ये प्रचंड वृष्टी झाल्याने अनेक खेडी पाण्याखाली गेली आहेत. 50 हजार लोकांना या पूरस्थितीचा फटका बसला असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी राज्य सरकारने आपले आपत्कालीन साहाय्यता दल कामाला लावले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधे पुरविली जात आहेत. भोगराई, बलिपाल, आणि बस्ता या तीन भागांवर या पूरस्थितीचा सर्वाधिक विपरीत परिणाम झाल्याचे स्पष्ट होत आहे. शेजारच्या झारखंड राज्यात मोठा पाऊस होत असून ते पाणीही या भागांमध्ये येत आहे. खलबादिया, कुलहा आणि बाऊनखाना या खेड्याचा संपर्क पूर्णत: तुटला आहे. बालासोर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही, असे प्रतिपादन केलेले असून पूरग्रस्त भागांना शक्य ते सर्व साहाय्य केले जात आहे, असे स्पष्ट केले. या भागात गेले तीन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे.
Comments are closed.