बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार, बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबीयांन

बीड गुन्हा: केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या (Santosh Deshmukh Murder Case) करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर बीड (Beed News) जिल्हा राज्यभरात चर्चेत आला आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाही. चोरी, घरफोडी, मारामारी, बलात्कार, छेडछाड आणि लुटमारी यांसारख्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही महिन्यात बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. आता पुन्हा एकदा बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेताच्या बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केल्याने एका महिलेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार वडवणी तालुक्यात घडला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवळा ते कोरडे वस्ती दरम्यान पायवाटेवर असलेल्या शेताच्या बांधावरील तब्बल 80-90 वर्षे जुनी लिंबाची झाडं तोडली जात होती. महिलेनं हे झाड तोडण्याबाबत जाब विचारताच, तिला मारहाण करण्यात आली. यावेळी तिचे पती, सासू-सासरे आणि इतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले.

आरोपी फरार

यानंतर त्यांनादेखील काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी बालकृष्ण शिंदे याच्यासह 16  जणांविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कावर चाललेली बळजबरी आणि महिलांवरील हिंसाचाराचा हा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

बीडमध्ये पैशांसाठी एकाचे अपहरण

दरम्यान, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात केवळ 10 हजार रुपयांच्या उसनवारीवरून तब्बल 80 हजार रुपयांची बळजबरीने वसुली करत एका तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (दि. 19) सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आरोपींनी पीडित तरुणाच्या आईला ‘मुलगा जिवंत पाहिजे असेल, तर 50 हजार रुपये पाठवा, नाहीतर त्याला पुन्हा कधीही पाहता येणार नाही,’ थेट फोन करून धमकी दिली. अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद असून, काही महिन्यांपूर्वी त्याने धनराज चाटे, पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आगाव यांच्याकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, आरोपींनी या रकमेवर दिवसाला 1 हजार रुपयांचे अवास्तव व्याज आकारले होते. या हिशोबाने एकूण रक्कम 80 हजार रुपयांवर गेली. रक्कम वसूल करण्याच्या उद्देशाने आरोपींनी कृष्णाचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याच्या आईकडून 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलाला सोडणार नाही, अशी थेट धमकीही दिली. घाबरलेल्या आईने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाईजवळील साकुर गावातून दोघा आरोपींना अटक केली आहे. उर्वरित दोघे अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Beed Bribe News : जलसिंचन विहिरीच्या प्रस्तावासाठी लाच घेणं भोवलं, बीडमधील सरपंच एसीबीच्या जाळ्यात

आणखी वाचा

Comments are closed.