दोन-तीन दिवसांत मान्सूनचा जोर वाढणार; मुंबईत येलो अलर्ट, कोकणात ‘जोर’धारा कोसळणार

मागील 15 दिवस दडी मारलेल्या मोसमी पावसाचा मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रातील जोर वाढणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मुंबई शहर व उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे, तर दक्षिण कोकणला अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याअनुषंगाने मुंबईला येलो अलर्ट आणि दक्षिण कोकणला ऑरेंट अलर्ट जारी केला आहे.

मे महिन्यात जोरदार हजेरी लावणारा पाऊस जूनमध्ये काही दिवस (19 जून) वगळता ‘थंड’च पडला. आता मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकण किनारपट्टी भागात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे. दक्षिण कोकणात, विशेषतः रायगड जिह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातही पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या तिन्ही जिह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करून स्थानिक नागरिकांसह मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह आसपासच्या ठाणे आणि पालघर या जिह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

n भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जून महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत कुलाबा केंद्रावर 477 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा 130 मिमी जास्त आहे. तसेच सांताक्रूझ केंद्रावर सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 425 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मान्सून 15 दिवस गायब राहिला. त्यात फक्त 19 जून रोजी कुलाब्यात रेकॉर्डब्रेक पाऊस पडला. त्या दिवशी 24 तासांत 146 मिमी पावसाची नोंद झाली.

Comments are closed.