शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेच पाहिजे, कृषिमंत्री कोकाटे पुन्हा बरळले

कर्जाच्या बोझाखाली दबलेला शेतकरी आत्महत्या करतोय, पण सरकारला आणि कृषिमंत्र्यांना काहीच दया येत नाही. शेतकऱयांबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज कर्जमाफीच्या मुद्दय़ावरून पुन्हा बरळले. शेतकऱयांनी कर्ज फेडलेच पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केल्याने शेतकरी वर्गात संताप निर्माण झाला आहे.
सत्तेवर आल्यानंतर शेतकऱयांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन महायुतीने दिले होते, परंतु सत्ता मिळून सहा महिने उलटले तरी महायुती सरकारने त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱयांच्या कर्जमाफीबद्दल योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे वक्तव्य केले होते. कृषिमंत्री कोकाटे यांनीही कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच आहे असे सांगत त्यातून हात झटकतानाच शेतकऱयांनी कर्ज फेडलेच पाहिजे, असे वक्तव्य आज केले. शेतीवर अवलंबून असणारा वर्ग कमी होत चालला आहे. कारण शेती परवडत नाही. याचे कारण शेतकऱयांना शाश्वत शेतीमालाचे दोन पैसे मिळतील अशी व्यवस्था सरकार म्हणून आम्ही करू शकलो नाही, अशी जाहीर कबुली त्यांनी दिली.
दूध व्यवसायात गुजरातचे अतिक्रमण
कोकाटे यांनी या वेळी महाराष्ट्रातील दूध व्यवसायात गुजरातचे अतिक्रमण होत असल्याचेही सांगितले. राज्यातील शेतकरी दूध संस्था स्थापन करण्यास तयार नाही. खासगी डेअरींमधून शेतकऱयांना अधिक पैसे मिळतात. त्यात गुजरातमधील खासगी डेअरींचे अतिक्रमण होत आहे असे ते म्हणाले.
Comments are closed.