Shivsena UBT Sanjay Raut on Bhaskar Jadhav political retirement and inner conflict in party
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. ते पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली असून ‘आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा, असे वाटते,’ असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाच्या उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेतून मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. संजय राऊत अनेकदा मला सावरण्याची भाषा करतात, असे विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली होती. पण याबाबत शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Shivsena UBT Sanjay Raut on Bhaskar Jadhav political retirement and inner conflict in party)
हेही वाचा : Sanjay Raut : मराठी भाषेवर होणारे अतिक्रमण थांबण्यासाठी आमचा जन्म, संजय राऊतांचा हल्लाबोल
खासदार संजय राऊत म्हणाले की, “भास्कर जाधव हे आमचे सहकारी असून शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. राजकारणामधील त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. ते अत्यंत चाणाक्ष नेते असून शिवसेनेच्या वाढीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणात असतात. त्यांच्याकडे पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या असून त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे आणि कडवट शिवसैनिक आहेत. आक्रमक आणि छान बोलतात, छान लढतात, आमच्या भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे? त्यांच्या मनात काय वेदना आहेत? ते आम्ही नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहेत.” असे म्हणत त्यांनी भास्कर जाधव यांची समजूत काढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
शिवसेना उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले होते की, “संजय राऊत मला दरवेळी सावरण्याची भाषा करतात. पण, मला भाषण करायला मिळत नाही म्हणून मी नाराज होत नाही. सगळ्या गोष्टींचे मला चांगले भान आहे. पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी नाराज, असा संदेश देण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न असतो. मात्र, पक्षाकडूनही कधीही तसे होत नाही. व्यासपीठावर शिवसेनेतील ज्येष्ठ नेते असतात, आदित्य ठाकरे हेही असतात. तरीही मला तिसऱ्या क्रमांकावर भाषण करायची संधी दिली जाते. माझ्यानंतर संजय राऊत आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषण करतात.” असे ते म्हणाले होते. तसेच, “शरद पवार यांची साथ सोडणे हे मला कधी कधी चुकीचे वाटते. मी शरद पवार यांना सोडल्याचा निर्णय चुकीचा होता, हे मी याआधीही स्पष्टपणे बोललो. पण, मला त्याची खंत वाटते असे अजिबात नाही,” असेही ते म्हणाले होते.
Comments are closed.