पृथ्वी शॉ मुंबईला राम राम करण्याच्या तयारीत, MCA ला पत्र लिहीत NOC ची केली मागणी

पृथ्वी शॉ मागील अनेक महिन्यांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. 25 वर्षांचा हा उमदा खेळाडू सध्या फिटनेस आणि खराब कामगिरीमुळे चाहत्यांच्या रडारवर आहे. 25 जुलै 2021 रोजी त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर खराब कामगिरीमुळे तो पुनरागमन करू शकला नाही. तसेच IPL मध्येही कोणत्याच संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो काही खास करू शकला नाही. अशातच आता त्याला दुसऱ्या राज्याकडून खेळण्याची ऑफर मिळाली आहे. त्यामुळे त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पत्र लिहित ना हरकत प्रमाणपत्राची (NOC) मागणी केली आहे.
खराब फिटनेसमुळे पृथ्वी शॉ ला रणजी करंडकातून मुंबईच्या संघातून बाहेर केले होते. तेव्हा त्याला वजन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. तसेच फिटनेस सुधारण्यासाठी ट्रेनिंग घेण्यास सांगितले होते. परंतु त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा झाली नाही आणि त्याला विजय हजारे करंडक 2025 मधूनही वगळण्यात आलं. परंतु आता पृथ्वी शॉ ने मुंबई क्रिकेट असोसिएशला पत्र लिहिले आहे. “करिअरच्या या टप्प्यावर मला दुसऱ्या राज्याकडून व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची चांगली संधी मिळाली आहे. मला विश्वास आहे की एक क्रिकेटर म्हणून मी चांगली प्रगती करू शकेन. त्यामुळे मी तुम्हाला नम्र विनंती करतो की मला ना हरकर प्रमाणपत्र (NOC) देण्यात यावे, ज्यामुळे मी आगामी देशांतर्गत हंगामात नवीन राज्याच प्रतिनिधीत्व करू शकेन.” असं पृथ्वी शॉ ने पत्रामध्ये लिहीलं आहे.
Comments are closed.