उपनगरी रेल्वे मार्गावर 21 वर्षांत 72,000 मृत्यू; 31 टक्के मृत प्रवाशांची अद्याप ओळख पटली नाही

’मुंबईची जीवनवाहिनी’ असलेल्या लोकल ट्रेनच्या मार्गावर 21 वर्षांत तब्बल 72 हजारांहून प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यातील 31 टक्के मृत प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. बहुतांश प्रवाशांचा (43,428) रुळ ओलांडताना मृत्यू झाला, तर धावत्या ट्रेनमधून पडून 14,396 प्रवाशांनी प्राण गमावला आहे. माहिती अधिकारांतर्गत अर्जावर रेल्वे पोलिसांनी ही धक्कादायक आकडेवारी उघड केली आहे.
मुंब्रा येथील अपघातामुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा नव्याने चर्चेत आला. रेल्वे मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवणारे डॉ. सरोश मेहता यांनी उपनगरी रेल्वे मार्गावर झालेल्या अपघाती मृत्यूचा तपशील माहिती अधिकारातून मागवला होता. त्यांच्या अर्जावर रेल्वे पोलिसांनी दिलेल्या उत्तरानुसार, 2003 ते 2024 या 21 वर्षांत 72,524 प्रवाशांचा उपनगरी रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या दहा वर्षांतही अनेक प्रवाशांना प्राण गमवावा लागला. उपलब्ध माहितीनुसार, 2014 ते 2024 या कालावधीत मध्य रेल्वेवर 18,836 आणि पश्चिम रेल्वेवर 25,846 प्रवाशांचा मृत्यू झाला. यात अनुक्रमे 5524 आणि 8416 प्रवाशांची अद्याप ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले नाही. 2019 पासून बेवारस मृतदेहांची टक्केवारी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातात मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे विद्रूप होते. तसेच त्यांचे फोन किंवा ओळखपत्रे यांसारख्या वस्तू सापडत नाहीत. अशा विविध कारणांमुळे मृत प्रवाशांची ओळख पटवणे रेल्वे पोलिसांपुढे आव्हान बनले आहे.
रेल्वे अपघातातील मृत व्यक्तीची ओळख पटत नाही, त्यावेळी मृतदेह 15 दिवस ते महिनाभर शवागारात ठेवला जातो. मृत व्यक्तीचा फोटो महानगरातील पोलीस ठाण्यांना पाठवला जातो, जेणेकरून त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणी हरवल्याची तक्रार नोंदवली आहे का हे शोधता येईल. जर या प्रक्रियेनंतरही कोणी दावेदार पुढे आला नाही तर त्या प्रवाशाच्या मृतदेहाचे दहन वा दफन केले जाते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
लोकलमधून पडून प्रवाशांचे मृत्यू होताहेत याला रेल्वे प्रशासन आणि सरकारची अनास्था कारणीभूत आहे. मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या समितीने सुरक्षित लोकल प्रवासासाठी काही वर्षांपूर्वी रेल्वे मंत्रालयाला विविध उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यात लोकलमधील सीटची संख्या कमी करणे, ठाणे ते टिटवाळा, ठाणे ते बदलापूर शटल सेवा चालवणे यांचा समावेश होता. त्याची पूर्तता अद्याप न केल्याने प्रवाशांचे बळी जाताहेत, असे आरटीआय कार्यकर्ता डॉ. सरोश मेहता म्हणाले.
Comments are closed.