IND Vs ENG 1st Test – ऋषभ-राहुलचा दणका!
>> संजय खडे
आहा! चौथा दिवस मनोहारी होता. चित्त हरपलं ते ऋषभ आणि राहुलच्या फलंदाजीमुळे. त्यात बचाव आणि आक्रमकतेचं बेमालूम असं मिश्रण होतं. हा पहिला कसोटी सामना हिंदुस्थानच्या झोळीत आल्यासारखाच आहे असं म्हणायला हरकत नसावी.
ऋषभ पंत आणि के.एल. राहुल मैदानावर उभे दिसले तोपर्यंत काळजाचा ठोका चुकला नाही. नाही म्हणायला पंतने कार्सच्या पहिल्याच षटकात दोन वेळा वल्ही मारून बाद होण्याचा प्रयत्न केला, पण समजूतदार राहुलने पंतला नजरेनेच वेसण घातली. थोडा संयम, कधी-मधी आक्रमण आणि हिंदुस्थानची इभ्रत या तीन गोष्टी पक्क्या ध्यानात ठेवण्याचा जणू तो इशाराच होता. पंतनेही मग मान खाली ठेवून फलंदाजी केली.
अर्थात राहुलने केलेला इशारा आणि उपजत लाभलेलं कौशल्य खिशात बाळगून त्यानंतर ऋषभ पंतने जे काही रूप दाखवलं त्याचं अप्रूप काय अन् कसं सांगावं. त्याच्या फलंदाजीत आक्रमकता होती. मात्र आक्रमकतेमध्ये उनाडपणा नव्हता. जिगर होती, पण जिवाचा घोर नव्हता! पंतचं हे आठवं शतक फक्त 130 चेंडूंत पूर्ण झालं. ते एक परिपूर्ण असं शतक होतं. एकाच कसोटीच्या दोन्ही डावांत शतक फटकावणारा पंत 79वा फलंदाज ठरलाय! इंग्लंडमध्ये चार शतकं दणकावणाऱ्या दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत जाऊन तो बसलाय!
दुसऱ्या बाजूने किंचित अवघडलेल्या राहुलने लढवलेला किल्ला पाहून लढवय्या वृत्ती पाहून त्याचं नाव बाजीप्रभू ठेवावं असंच मला एकदा वाटून गेलं!
आपल्या कारकिर्दीतलं नववं शतक राहुलने पूर्ण केलं. ड्राइव्हज, कट, पूलच्या सहाय्याने साजरं झालेलं हे शतक माझ्या मते सर्वोत्तम शतक होतं. 202 चेंडूंत झळकवलेल्या या शतकात राहुलने फक्त एक चूक केली. कार्सच्या ऑफ स्टंपबाहेरच्या चेंडूला वाकुल्या दाखवण्याचा नादात उडालेला झेल ब्रूक घेऊ शकला नव्हता. राहुलच्या नावावर तेंव्हा 59 धावा होत्या.
पाचव्या आणि शेवटच्या दिवशी किमान 380 धावांचं आव्हान इंग्लंडसमोर ठेवणं आवश्यक आहे.
कारण 2022च्याच जुलै महिन्यात इंग्लंडने शेवटच्या दिवशी 378 धावांचा पाठलाग करून आपल्यालाच हरवलं होतं! अशा चित्तथरारक विजयाला गवसणी घालताना जो रूट आणि जॉनी बेयरस्टोने तब्बल 269 धावांची तडाखेबाज भागीदारी केली होती. थोडक्यात किमान 380 धावांचं आव्हान ठेवणं जरुरी आहे.
Comments are closed.