मुंबई, ठाण्यात मुसळधार; मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, प्रवाशांची तारांबळ

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई-ठाण्यात तर अनेक ठिकाणी मुसळधार जलधारा सुरू आहेत. याचा फटका नेहमी प्रमाणे मुंबईची लाइफ लाइन मानली जाणाऱ्या रेल्वे सेवेला बसला असून मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिरापर्यंत सुरू आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून नोकरदार वर्गाला गंतव्य स्थानी पोहोचण्यास उशीर होत आहे.
सोमवारी रात्री पासून मुंबई आणि उपनगराच्या काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. संततधार पावसाने मंगळवारी पहाटे पर्यंत मुंबई ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम करण्यास सुरुवात केली. आधी उपनगरीय रेल्वे वाहतूक (लोकल) पाच ते 10 मिनिटे उशिराने धावू लागली. मात्र शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत ही वाहतूक 15 ते 20 मिनिटांपर्यंत उशिराने झाली.
हवामान विभागाने सोमवारी वर्तवलेला अंदाज ठरला खरा
हवामान विभागाने यासंदर्भात सोमवारी अंदाज वर्तवला होता. येत्या दोन दिवसात मुंबई, कोकण किनारपट्टीसह राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज जारी करण्यात आला होता. त्याचा आज पहाटेपासूनच प्रत्यय येत आहे.
Comments are closed.