Rahul Gandhi claims 8 percent increase in voters in Fadnavis’ constituency


(Maharashtra Election) नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा लावूनच धरला आहे. अलीकडेच त्यांनी विविध भाषांतील वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या लेखामध्ये या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा आरोप त्यांनी पुनश्च केला होता. सांगोवांगी माहिती बाजूला ठेवली तरी, अधिकृत आकडेवारीवरून संपूर्ण खेळ उघड होतो, असे त्यांनी म्हटले होते. आज, मंगळवारी पुन्हा ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. (Rahul Gandhi claims 8 percent increase in voters in Fadnavis’ constituency)

गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीत पानिपत झाले. तर, लोकसभेत पराभूत झालेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत न भूतो ना भविष्यती असा विजय मिळाला. विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या 149 जागांपैकी भाजपाने 132 जागा जिंकल्या. म्हणजेच 89 टक्के स्ट्राइक रेट होता. तर, त्याआधी पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा स्ट्राइक रेट फक्त 32 टक्के होता, याकडे लक्ष वेधत राहुल गांधी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला लिहिलेल्या लेखात, या निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

तर, फेब्रुवारी पत्रकार परिषद बोलावून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाबद्दल संशय व्यक्त केला होता. या निवडणुकीत वाढलेल्या मतदारांचा तपशील हा फोटो आणि पत्त्यासह आम्हाला हवा आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातील तसेच विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेली अंतिम मतदार यादी आम्हाला हवी आहे. हे नवे मतदार कोण आहेत, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, अशी मागणी त्यांनी केली होती.

लोकशाहीची ही मॅच फिक्सिंग असल्याची टीका त्यांनी अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लेखात केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या एक महिन्यानंतर, जेव्हा उच्च न्यायालयाने आयोगाला मतदान केंद्रांची व्हिडिओग्राफी तसेच सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याचे निर्देश दिले, तेव्हा केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून, निवडणूक आचार नियम, 1961च्या कलम 93(2)(अ)मध्ये सुधारणा केली. याद्वारे, सीसीटीव्ही फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड रोखण्यात आले आहे. हा बदल आणि त्याचे टायमिंग हे बरेच काही सांगून जाते, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

त्यांनी आज, मंगळवारी यासंदर्भत सोशल मीडियावर पुन्हा एक पोस्ट केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील मतदारांमधील मतदारांच्या यादीत अवघ्या 5 महिन्यांत 8 टकक्यांची वाढ झाली आहे. काही बुथवर 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर, बीएलओंनी (Booth Level Officer) अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नोंदवले आहे. पत्त्याची पडताळणी नसलेले हजारो मतदारही माध्यमांनी उघड केले असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

या सर्वांबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय? एकतर याबाबत मौन बाळगून आहे किंवा सहभागी आहे. या काही आगळ्यावेगळ्या त्रुटी नाहीत तर, थेट मतांचीच चोरी आहे आणि ती झाकण्याची धडपड सुरू आहे, ती एकप्रकारे कबुलीच आहे. म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदारयादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित जारी करण्याची मागणी करत आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.



Source link

Comments are closed.