भारतीय कोस्टल झोन संबंधित डब्ल्यूएमओ चेतावणी
अरबी समुद्र, बंगाल उपसागराची पातळी वेगाने वाढतेय : अहवालात दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक हवामानशास्त्र संघटनेचा (डब्ल्यूएमओ) एक नवा अहवाल खळबळ उडवून देणारा आहे. या अहवालात भारताच्या किनारी क्षेत्रांमध्ये सागराची पातळी भयानक स्वरुपात वाढत असल्याचे म्हटले गेले आहे. यानुसार सागराची पातळी पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने वाढू लागली आहे. आशियात उष्णता वाढत असल्याने हवामानात बदल होत असून यामुळे लोकांना फटका बसत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. किनारी क्षेत्रांमध्ये या स्थितीचा अत्यंत प्रतिकूल प्रभाव पडू शकतो आणि सखल भागांमध्ये सागराची पाणी शिरू शकते.
डब्ल्यूएमओच्या नव्या अहवालानुसार सागराची पातळी दरवर्षी 3.7-3.8 मिलिमीटरने यापूर्वी वाढत होती. परंतु आता हे प्रमाण वाढून 4 मिलिमीटर झाले आहे. ही वाढ सागरी किनाऱ्यापासून 50 किलोमीटरच्या कक्षेत दिसून येत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे सागराची पातळी वेगाने वाढत आहे. यामुळे किनारी क्षेत्रांमध्ये राहणारे लोक आणि छोट्या बेटांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. भारताचा दक्षिण भाग देखील यामुळे प्रभावित होत आहे.
दक्षिण चीन समुद्रानंतर सर्वाधिक वाढ
बंगाल उपसागराच्या उत्तर हिस्स्यातही सागराची पातळी वेगाने वाढत आहे. भारातच्या पूर्व किनाऱ्याला (पश्चिम बंगाल ते तामिळनाडुपर्यंत) बंगालचा उपसागर व्यापतो. या क्षेत्रात जलस्तर वाढण्याचे प्रमाण पश्चिम उष्णकटिबंधीय प्रशांत क्षेत्रानंतर (दक्षिण चीन समुद्र) सर्वाधिक आहे. समुद्राची पातळी सर्वत्र एकसारखी वाढत नाही, परंतु हिंदी महासागराचे तापमान, पूर्व आणि पश्चिम दोन्ही किनाऱ्यांवर जागतिक सरासरीपेक्षा अधिक आहे. 2024 मध्ये जागतिक सरासरी समुद्र जलस्तर वृद्धी 3.4 मिलिमीटरपर्यंत पोहोचली. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर हे प्रमाण 3.9 मिलिमीटर तर पूर्व किनाऱ्यावर 4 मिलिमीटर नोंदविले गेले आहे.
उष्णता वाढल्याने आपत्तीच्या घटना
डब्ल्यूएमओच्या ‘स्टेट ऑफ द क्लायमेट इन एशिया 2024’च्या अहवालात आशियात उष्णता जागतिक सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट वेगाने वाढत असल्याचे म्हटले गेले आहे. यामुळे हवामानात बदल असून क्षेत्राला मोठे नुकसान होत आहे. 1991-2024 दरम्यान उष्णता वाढीचा दर 1961-90 च्या कालावधीच्या तुलनेत जवळपास दुप्पट राहिला. उष्णता वाढल्याने मध्य हिमालय आणि तियानशान पर्वताच्या 24 पैकी 23 ग्लेशियर्सचा बर्फ वितळला आहे. यामुळे ग्लेशियर सरोवरांमध्ये पूर अन् भूस्खलनाच्या घटनाही वाढल्या आहेत.
वायनाडच्या भूस्खलनाचा उल्लेख
अहवालात भारतात 2024 मध्ये झालेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचाही उल्लेख आहे. हवामान बदलामुळे केरळच्या वायनाड जिल्ह्यात भीषण भूस्खलन झाले, ज्यात 350 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असे यात म्हटले गेले आहे. वायनाडमध्ये 48 तासांमध्ये 500 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यावर भूस्खलन झाले होते.
Comments are closed.