उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या तारेचा धक्का लागल्याने मृ्त्यू

लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव तांडा (सेवादासनगर तांडा) येथे बुधवारी पहाटे श्रीकृष्ण श्रीराम आडे (29वर्ष) या तरुणाचा विजेच्या तारेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सेवादास नगर येथील तरुण शेतकरी श्रीकृष्ण श्रीराम आडे हे आपल्या शेतात रात्रीची लाईट असल्याने ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते .सायंकाळी पाणी लावून ते रात्री घरी आले परंतु जोरदार वारे वाहत असल्याने लाईट सारखी ये जा करत होती. त्यामुळे शेतातील ऑटोमॅटिक स्टार्टर चालू आहे का नाही हे पाहण्यासाठी श्रीकृष्ण श्रीराम आडे हे पहाटेच आपल्या शेतामध्ये गेले परंतु ते शेतात जाण्यापूर्वी संध्याकाळी त्यांच्या शेतातील विद्युत खांबावरील विद्युत वाहक तार तुटून जमिनीवर पडली होती अंधारात तुटलेली विद्युत तार न दिसल्याने जमिनीवर पडलेल्या तारेला चिटकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे डी वाय राजकुमार खेडेकर, गादवड शाखेचे कनिष्ठ अभियंता सचिन खराबे, सेवा सदन नगर येथील लाईनमेन शरद राजमाने यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तांदूळजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. त्यानंतर सायंकाळी पाचच्या दरम्यान त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीकृष्ण श्रीराम आडे यांच्या मृत्यू पश्चात त्यांची आई,पत्नी, मुलगी, व सात बहिणी असा परिवार आहे.या संदर्भात मुरुड पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बीट अंमलदार अण्णासाहेब कुंभार व पो.हे.कॉ. विठ्ठल साठे हे करत आहेत.

Comments are closed.