IND vs ENG: दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला हरवण्यासाठी भारतीय संघाला कराव्या लागणार 'या' 3 गोष्टी
भारत वि इंग्लंडची दुसरी कसोटी: सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. दरम्यान भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना (20 ते 24 जून) दरम्यान लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने 5 गडी राखून भारताचा धुव्वा उडवला. लीड्स कसोटीत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळला जाईल. पहिल्या कसोटीत भारतीय संघाच्या अनेक उणिवा उघड झाल्या होत्या. अशा परिस्थितीत, दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नक्कीच कराव्यात अशा 3 गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.
3) कुलदीप यादवची प्लेइंग इलेव्हनमध्ये एंट्री- पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर सुनील गावस्कर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की, दुसऱ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यावे. गावस्कर म्हणाले की, बर्मिंगहॅमच्या खेळपट्टीवर मनगटी फिरकी गोलंदाज खूप प्रभावी ठरू शकतो. कुलदीपला इंग्लंडमध्ये खेळण्याचा जास्त अनुभव नाही, पण बर्मिंगहॅमची खेळपट्टी तिसऱ्या दिवसानंतर फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकते.
2) बुमराह व्यतिरिक्त इतर गोलंदाजांना जबाबदारी उचलावी लागेल- मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स घेतल्या होत्या, याव्यतिरिक्त त्याच्या गोलंदाजीवर अनेक झेलही सुटले. तो दुसऱ्या डावात एकही विकेट घेऊ शकला नाही, परंतु इतर गोलंदाजांनी खूप उशिरा सुधारणा केली होती आणि तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता. प्रसिद्ध कृष्णाने सामन्यात 5 विकेट्स नक्कीच घेतल्या, पण त्याचा 6 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेट भारतीय संघाला खूप भारी पडला. दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आकाश दीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करणे हा काही वाईट पर्याय ठरणार नाही.
1) लोअर ऑर्डर फलंदाजांचे सहकार्य आवश्यक- लीड्स कसोटीत भारतीय संघाच्या पराभवाचे एक मुख्य कारण म्हणजे लोअर ऑर्डर फलंदाजांचे फ्लॉप होणे. पहिल्या डावात भारताच्या शेवटच्या 7 विकेट्स केवळ 41 धावांच्या आत पडल्या होत्या, तर दुसऱ्या डावात भारतीय संघाने शेवटच्या 6 विकेट्स 31 धावांच्या अंतराने गमावल्या. भारत पहिल्या डावात सहज 550 धावा करू शकला असता, परंतु लोअर ऑर्डर फलंदाजांच्या अपयशामुळे तसे झाले नाही. यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली असती. जेव्हा दुसऱ्या डावाची वेळ आली, तेव्हा भारतीय संघ इंग्लंडसमोर 450+ चे लक्ष्य ठेवण्याकडे वाटचाल करत होता, परंतु लोअर ऑर्डरच्या अपयशामुळे लक्ष्य फक्त 371 चे निश्चित झाले. त्यामुळे भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
Comments are closed.