What a ride! नासाचे ‘फाल्कन 9’ अंतराळात झेपावले, तब्बल 41 वर्षांनंतर हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची गगन भरारी

एकामागोमाग एक अंतराळ मोहिमा राबवून अवकाश कवेत घेणाऱया हिंदुस्थानच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. नासाच्या ‘ऑक्सिऑम-4’ या मोहिमेअंतर्गत आणखी एका भारतीयाने आज अंतराळाच्या दिशेने भरारी घेत इतिहास घडवला. भारतीय हवाई दलाचे ग्रूप पॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी हा मान मिळवला आहे. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात झेप घेणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे हिंदुस्थानी ठरले आहेत.

खराब हवामान व तांत्रिक कारणांमुळे अनेकदा लांबणीवर पडलेले ही मोहीम आज अखेर सुरू झाली. अमेरिकेच्या जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरवरून आज दुपारी 12 वाजता नासाच्या ‘फाल्कन 9’ या रॉकेटने उड्डाण भरले. या मोहिमेचे नेतृत्व ज्येष्ठ व अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन करणार आहेत. शुभांशु यांच्याबरोबरच या मोहिमेत पोलंडचे स्लावोज युनान्स्की आणि हंगेरीचे तिबोर कापू यांचा समावेश आहे. अंतराळवीरांचा हा चमू तब्बल 28 तास प्रवास करून हिंदुस्थानी वेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी 4.30 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचेल.

यापूर्वी 1984 साली सोव्हिएत रशियाने हाती घेतलेल्या अंतराळ मोहिमेत हिंदुस्थानचे राकेश शर्मा सहभागी झाले होते. हिंदुस्थानकडून अंतराळात भरारी घेणारे ते पहिले अंतराळवीर ठरले होते. त्यानंतर शुभांशु हे दुसरे अंतराळवीर असून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे ते पहिलेच भारतीय ठरणार आहेत. शुभांशु हे मूळचे उत्तर प्रदेशच्या लखनौचे रहिवासी आहेत. एक वर्षाचे कठोर प्रशिक्षण आणि चाचणीनंतर नासाने त्यांची या मोहिमेसाठी निवड केली आहे.

आईवडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

शुभांशु शुक्ला यांचे आजचे अंतराळ उड्डाण हा त्यांच्या कुटुंबासह भारतीयासांठी अभिमानाचा क्षण ठरला. असंख्य भारतीय या उड्डाणाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. आपल्या मुलाचा हा पराक्रम पाहताना शुभांशु यांच्या आईवडिलांच्या डोळय़ांत आनंदाश्रू होते.

माझ्या खांद्यावर तिरंगा आहे… माझे देशवासीय माझ्यासोबत आहेत याची साक्ष तो देतोय!

रॉकेट स्थिरावताच हिंदीतून पाठवला संदेश

‘फाल्कन-9’ हे रॉकेट अंतराळाच्या कक्षेत स्थिर झाल्यानंतर लगेचच शुक्ला यांनी हिंदीमध्ये संदेश पाठवला. ‘नमस्कार माझ्या प्रिय देशवासीयांनो, 41 वर्षांनी आपण अंतराळात पोहोचलो आहोत. हा प्रवास खरोखरच उत्तम होता. हा केवळ माझा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतचा प्रवास नाही, तर भारताच्या मानवी अंतराळ सफरीची सुरुवात आहे. हा नवीन अध्याय लिहीत असताना आपण सर्व सोबत असू अशी आशा आहे,’ असे शुभांशु शुक्ला म्हणाले.

Comments are closed.