पंतप्रधान मोदी काही लोकांसाठी पहिले आहेत.

शशी थरुर यांच्यावर मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अलिकडच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसत आहे. या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरुर यांच्यावर यामुळे खोचक टिप्पणी केली आहे. आमच्या पक्षातील काही जणांसाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ‘प्रथम’ आहेत, असा टोमणा त्यांनी मारला आहे. शशी थरुर यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले असून ‘उडने के लिये किसीके इजाजत की जरुरत नाही, पंख आपके है, मगर आस्मान किसीका नाही’ असा काव्यात्म प्रतिटोला शशी थरुर यांनी एक्सवर पोस्ट करुन लगावला आहे.

येथे एका पत्रकार परिषदेत खर्गे यांना थरुर यांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. थरुर यांचे भाषेवर प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसच्या कार्यकारिणीत अद्यापही स्थान देण्यात आले आहे. ‘सिंदूर’ अभियानात आम्ही सर्वांनीच सरकारचे समर्थन केले होते. कारण देशावर संकट कोसळते, तेव्हा पक्षभेद आणि मतभेद विसरुन सरकारच्या पाठीशी उभे राहणे, ही आपली परंपरा आहे. आमच्यासाठी देश प्रथम आहे. तर आमच्यातीलच काही जणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथम आहेत, असे उत्तर मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले होते.

थरुर स्वत:च्या भूमिकेशी ठाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची माझी विधाने वस्तुस्थितीदर्शक आहेत. काही जणांना ती आवडत नसतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. सरकारवर किंवा त्याच्या नेत्यावर नेहमी टीका करण्यातून काही साध्य होत नाही. उलट तसे केल्याने विरोधी पक्षांची नकारात्मकता दिसून येते. देशाचा प्रश्न उभा असताना आपापसातील मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र येण्यातच हित आहे, अशी माझी भूमिका आहे. काँग्रेस सोडण्याचा विचार मी कधीही केलेला नाही. तथापि, मी कोणाची स्तुती करावी किंवा कोणाची निंदा करावी, हा माझा प्रश्न आहे. पक्षातील काही जणांच्या ध्यानात ही बाब येत नाही, असे प्रत्युत्तर थरुर यांनी दिल्याने त्यांच्यातील आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांमधील दरी वाढली आहे. ’सिंदूर’ अभियानाचा एक भाग म्हणून भारताने पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी अनेक देशांमध्ये पाठविलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांत थरुर यांना महत्वाचे स्थान देण्यात आलेले होते. अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, काँग्रेसने सादर केलेल्या सूचीत त्यांचे नावही नव्हते. त्यामुळे थरुर आणि काँग्रेस यांच्यात मोठे मतभेद निर्माण झाल्याचे वातावरण आहे.

Comments are closed.