सत्तेचे माजकारण! संपूर्ण देशात महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल, अशी मालिका राज्यात सुरू – उद्धव ठाकरे

“गेल्या काही दिवसांत, काही महिन्यांमध्ये, विशेषतः सत्ताधाऱ्यांचा जो माज आहे, मी याला राजकारण म्हणत नाही. तर, सत्तेचे माजकारण म्हणत आहे. कुठे बॉक्सिंग होते, कुठे नवीन चड्डी बनियन गॅंग आली आहे, तिचा प्रताप आपण पाहत आहोत. उघडलेले खोके बघत आहोत, याच्यानंतर काल विधिमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली. एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल, अशी काही दिवसांत घटनांची मालिका होती”, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “कालच्या मारहाणीची प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उच्चस्तरिय समिती नेमली आहे. पण हे सुरू कुठून झालं आणि नेमकं कसं झालं, याच्या मुळापाशी गेले तर, त्या उच्चस्तरीय समितीला काही अर्थ आहे. आपली सत्ता आलीच पाहिजे, म्हणून गुंडांना धमक्या दिलं जाणं की, तू आमच्याकडे ये नाही तर, तुरुंगात जा. त्यांच्याकडे गेल्यानंतर गंगा स्नान घालून पवित्र करून राजकरणात वापरायचं, कारण सत्ता आली पाहिजे. तिथून मग गुन्हेगारांचा राजकीय जन्म होतो. यातून या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. माझं प्रामाणिक मत आहे की, सर्व पक्षांनी एकत्रित बसून असे जर गुंड कोणीही घेतले असतील आणि त्यांना सत्तेसाठी वापरलं गेलं असेल किंवा कळत न कळत, हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरात आहे, त्यांना उमेवारी देऊन निवडून आणून सत्तापदे दिली गेली असतील तर, ती आधी काढून घेतली पाहिजे.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “जर विधान भवनाच्या आवारात मारामाऱ्या होत असतील तर, मला खरोखर लाज वाटते. देशात आपल्या महाराष्ट्राची प्रतिमा काय झाली असेल. आजपर्यंत असं पूर्वी कधी झालं होतं, असं माझ्या तरी आठवणीमध्ये नाही. या गोष्टीसाठी उच्चस्तरिय समिती नेमण्यात आली आहे, काय करणार ही उच्चस्तरिय? मूळ हे आहे की, प्रत्येक पक्षात राजकारण्यांनी सत्तेच्या लालसेपायी गुंडांना घेतलं. दाऊदच्या साथीदारांसोबतचे पार्टीचे व्हिडीओ, इकबाल मिरचीसोबत भागीदारी, कोणाचे आणखी कोणासोबत संबंध, या सगळ्या गोष्टींमध्ये आरोप करणारे तेच (भाजप). पक्षात घेरे तेच, आरोप मागे घेऊन त्यांना चंदनाचा टिळा लावणारे तेच. अशा लोकांकडून दुसरी अपेक्षा काय करावी? लोकशाहीचा खून करणारे राजकरणी विधिमंडळात आणि महाराष्ट्रात वावरायला लागले तर, जनतेने काय करायचे?”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “विधिमंडळाचे अधिवेशन जनता मोठे अशाने पाहत असते की, माझ्या प्रश्नाला नेमकं काही उत्तर मिळालं की नाही? काल मी आलो होतो. तेव्हा आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि त्यांचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यांना मंत्र्यांनी काल आणि आजही भेट दिली नाही. काही घोटाळे आम्ही बाहेर काढले, त्याच्यावरती तुमच्या काळत काय झालं, आमच्या काळात काय झालं, आम्ही काही गुन्हा केला असेल तर तुम्ही तो आमच्या पदरात जरूर टाका. पण आज तुम्ही आहात, जवळपास हे तिसरं, चौथं वर्ष आहे. तुमच्या सत्तेचा काळ सुरू आहे, त्यामुळे आज जे काही घडत आहे, याची जबाबदारी तुम्ही काल काय घडलं, कोणाच्या काळात घडलं, असं बोलून झटकू शकत नाही. जे जाही घडत आहे, याची जबाबदारी आजच्या सत्तेने घेतलीच पाहिजे. पुढे असं घडू नये, यासाठी काय उपाययोजना करणार, हे त्यांनी सांगितलं पाहिजे.”

Comments are closed.