‘अंगावर शहारे आले…’ भारताच्या थरारक विजयानंतर क्रिकेटविश्वात भावनांचा महापूर, तेंडुलकरपासून प

इंग्लंड विरुद्ध भारत 5 वा कसोटी अद्यतनः भारताने पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय मिळवत 2025 ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ 2-2 अशी बरोबरीत संपवली. या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आणि भारतातील अनेक दिग्गज खेळाडूंनी या कामगिरीवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या.

चौथ्या दिवशी पावसामुळे आणि खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, तेव्हा इंग्लंडचे 6 बाद 339 धावा होत्या आणि विजयासाठी केवळ 35 धावांची गरज होती. मात्र, अखेरच्या दिवशी भारताला लागलेले चार विकेट्स मिळवण्यासाठी मोहम्मद सिराजने जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेतले आणि 85.1 षटकांत इंग्लंडला 367 धावांवर गारद करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. प्रसिद्ध कृष्णाने देखील महत्वाची भूमिका बजावत 126 धावा देऊन 4 बळी घेतले.

या दिमाखदार विजयावर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांनी भारताचे कौतुक केले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, हरभजन सिंग, ऋषभ पंत, शिखर धवन, इरफान पठाण आणि विराट कोहली यांच्यासह अनेकांनी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या युवा टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच मोहम्मद सिराजच्या दमदार गोलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

‘अंगावर शहारे आले…’ – सचिन तेंडुलकर

भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी भारताच्या थरारक विजयानंतर त्यांच्या X (एक्स) अकाउंटवर पोस्ट करत लिहिलं की,  “टेस्ट क्रिकेट… खरंच शहारे आणणारा सामना होता, मालिका 2-2, परफॉर्मन्स 10/10. भारताचा सुपरमॅन! काय अफलातून विजय!” या पोस्टसोबत सचिनने दोन फोटो शेअर केले आहेत, एकात संपूर्ण टीम इंडिया विजयाचा जल्लोष करताना दिसते आणि दुसऱ्या फोटोत आहे मोहम्मद सिराज. सचिनच्या या पोस्टवरून स्पष्ट होतं की, त्यांनी सिराजला ‘सुपरमॅन’ असं विशेषण दिलं आहे.

युवराज सिंगची जबरदस्त पोस्ट…

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयावर माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांनी एक खास पोस्ट करत लिहिलं की, “खरं आत्मविश्वास कसा असतो, हेच यावरून दिसून येतं. आपल्या मुलांनी टेस्ट क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने पुनरागमन केलं, तो खरा ‘कमबॅक’ आहे, भारताने ओव्हलवर लढत लढत ऐतिहासिक विजय मिळवला.” या पोस्टमध्ये मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप यांच्या प्रदर्शनाचं त्यांनी खास कौतुक केलं. तसंच, शुभमन गिलच्या नेतृत्वाचंही अभिनंदन केलं.

“सिराज कधीच टीमला निराश करत नाही…” – सौरव गांगुली

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताच्या थरारक विजयानंतर प्रतिक्रिया देताना लिहिलं की, “टीम इंडियाचा जबरदस्त विजय. मोहम्मद सिराज हा असा खेळाडू आहे, जो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात टीमला कधीच निराश करत नाही. प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत… सर्वांनी अफलातून कामगिरी केली. या तरुण संघात सातत्य आहे आणि तेच त्यांची खरी ताकद आहे.”

शिखर धवनचं खास ट्विट, “काय कमबॅक होता हा…”

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर माजी सलामीवीर शिखर धवन यांनी त्यांच्या X अकाउंटवर लिहिलं की, “काय कमबॅक होता हा… मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी अफलातून कमाल दाखवली. दोघांचा आत्मविश्वास आणि शांतपणे खेळण्याची शैली कमाल होती, सगळं काही परफेक्ट!” धवन पुढे म्हणाले की, “शुभमन गिल, तुझं नेतृत्व अगदी पॉइंटवर होतं आणि अजूनही तुझ्याकडून खूप काही अपेक्षित आहे. हा सामना पाहून आनंद झाला. तुमच्यापैकी प्रत्येकावर मला अभिमान आहे.”

पंतचं भावनिक प्रतिक्रिया आणि विराटचं खास कौतुक!

दुखापतीमुळे अखेरच्या कसोटीमधून बाहेर राहिलेला ऋषभ पंतने आपल्या भावना इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिलं की, “ही टीम परिस्थितींशी लढणारी, समर्पित आणि देशासाठी काहीही करण्याची तयारी ठेवणारी आहे. या दौऱ्यात खूप त्याग करावा लागला, पण त्यापेक्षा अधिक काहीतरी मिळालं. आपल्या समर्थक आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफचे मनापासून आभार…”


दरम्यान, भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीनेही त्याच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लिहिलं की, “टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय… सिराज आणि प्रसिद्धमुळे भारताला हा जबरदस्त विजय मिळवता आला. विशेषतः सिराजबद्दल सांगायचं झालं, तर त्याने स्वतःला पूर्णपणे संघासाठी झोकून दिलं. त्याच्यासाठी मला खूप आनंद होतोय…”

इरफान पठान आणि हरभजन सिंगकडून जोरदार अभिनंदन…

आपल्या अधिकृत X (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवरून इरफान पठान याने लिहिलं की, “ही मालिका पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून देते, की क्रिकेट कोणासाठी थांबत नाही.”

तर माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी लिहिलं की, “सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचं जबरदस्त प्रदर्शन… अफलातून विजय. प्रत्येक खेळाडूचं अभिनंदन…. तुम्ही सगळ्यांनी मन जिंकलं आहे.”

Comments are closed.