दहीहंडीच्या सहाव्या थरावरुन पडून चिमुकल्या महेशचा अंत, पोलिसांना घातपाताचा संशय, नेमकं काय झालं
मुंबई दही हंडी 2025: दहीहंडीचा सराव करताना सहाव्या थरावरुन खाली कोसळल्याने मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथे बालगोविंदांचा मृत्यू झाला होता. दहिसर पूर्वेला असणाऱ्या केतकीडपाडा परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला होता. यामध्ये नवतरुण गोविंदा पथकाचा बालगोविंदा महेश रमेश जाधव (वय 11) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर आल्याने तो रविवारी रात्री साधारण पावणेदहाच्या सुमारास गोविंदा पथकासोबत सराव करत होता. महेश हा सहाव्या थरापर्यंत चढत जात होता. त्यावेळी अचानक त्याचा तोल गेला अन् तो खाली पडला. थेट जमिनीवर कोसळल्याने त्याला गंभीर इजा झाली. गोविंदा पथकातील तरुणांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी महेशला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी नवतरुण मित्रमंडळ गोविंदा पथकाचा अध्यक्ष बाळू सुरनार याच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, नंतर महेशच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसंनी गोविंदा पथकाचा अध्यक्ष बाळू सुरनार याच्यावर निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. महेश जाधव हा दहिसर पूर्वेला धारखडी परिसरात राहत होता. त्याची आई घरकाम करते तर वडील मजुरी करतात. त्याला तीन लहान भावंडे आहेत. हा प्रकार नेमका कसा घडला, यामध्ये कोणाची चूक होती, त्याचा पाय सटकला की नेमके काय झाले, याचा तपास सध्या दहिसर पोलिसांकडून सुरु आहे. महेश जाधव हा पाय घसरुन खाली पडला की, यामागे काही घातपात आहे, याचा तपासही पोलिसांकडून सुरु आहे.
येत्या 16 ऑगस्टला दहीहंडीचा सण होणार आहे. मुंबईतील दहीहंडी उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. या उत्सवात मुंबईतील हजारो गोविंद पथकं सहभागी होत असतात. ही गोविंदा पथकं दिवसभर शहरभरात फिरुन विविध ठिकाणी मानाच्या हंड्या फोडत असतात. दहीहंडी फोडताना अनेक मंडळांकडून सात ते नऊ थर रचले जातात. हे थर रचताना अनेक गोविंदा जखमीही होतात. मुंबई उच्च न्यायालयाने लहान मुलांना वरच्या थरावर चढवू नये, असा आदेश दिला आहे. मात्र, बहुतांश गोविंदा पथकं त्याकडे कानाडोळा करतात. याशिवाय, दहीहंडी खेळताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गादी अशा मुलभूत सुरक्षा साधनांचा वापर करावा, असेही निर्देश देण्यात आले होते. मात्र, बहुतांश गोविंदा पथकांकडून दहीहंडीचा सराव करताना या नियमांचे पालन केले जात नाही.
https://www.youtube.com/watch?v=_9splzc7vs4
आणखी वाचा
राजकारण करुन प्रो गोविंदा स्पर्धेतून वगळल्याचा जय जवानचा आरोप; आता पुर्वेश सरनाईक म्हणाले…
आणखी वाचा
Comments are closed.