सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एसआयटी स्थापन करा, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे पोलीस महासंचालकांना आदेश

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी गुरुवारी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. याप्रकरणी सूर्यवंशी यांची बाजू मांडताना यापूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी विनंती केली होती.
या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत, असे याचिकाकर्ती विजया सूर्यवंशी यांच्या वतीने खंडपीठाला सांगण्यात आले. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सुधारित दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खंडपीठात सरकारकडून निवेदन करताना सांगण्यात आले की, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या न्यायालयाने विशेष तपास पथक नियुक्त करावे, या विनंतीवरून सरकारकडून सांगण्यात आले की, बदलापूर प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश होते. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी पथक स्थापन केले होते. याप्रकरणातही खंडपीठाने पोलीस महासंचालकांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी यांनी याचिका दाखल केली असून, त्यांच्या वतीने अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी, तर राज्य शासनाकडून मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.
Comments are closed.